![]()
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला पोलिसांनी घातलेल्या अटी आणि COEP परिसरातील काँग्रेस-NSUI आणि ABVP कार्यकर्त्यांमधील वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “भाजप हा डरपोक लोकांचा पक्ष असून, सत्तेच्या कवचकुंडलांमुळेच त्यांची ही दादागिरी सुरू आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल,” असा घणाघाती दावा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राहुल गांधी परदेशातून आलेत का? पुणे पोलिसांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी तब्बल ३० अटी घातल्या आहेत. यावर तीव्र आक्षेप घेत राऊत म्हणाले, “राहुल गांधी हे या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. मोदी-शहा त्यांना मानत नसले तरी ते देशाचे नागरिक आहेत. राहुल गांधी काय परदेशातून आले आहेत का? इतरांच्या कार्यक्रमांसाठी अशा अटी टाकल्या जातात का? यावरून एकच स्पष्ट होते की, सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून हे पूर्णपणे घाबरलेले सरकार आहे.” कार्यक्रम उधळण्याची भाषा हा दहशतवादच! पुण्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी ABVP ला थेट इशारा दिला. “ABVP गुंडगिरी करत आहे, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना हे बळ कुठून मिळते, हे आम्हाला माहीत आहे. पण ही गुंडगिरी भविष्यात निश्चितच मोडीत काढली जाईल. राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कुणी करत असेल, तर तो स्पष्टपणे दहशतवाद आहे. अशी भूमिका घेणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध नाही भाजपवर वैचारिक हल्ला करताना राऊत म्हणाले की, “वंदे मातरम आणि भाजपचा अजिबात संबंध नाही. वंदे मातरमचा खरा संबंध काँग्रेसशी आहे.” तसेच, आमदार रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या विजयाचे बॅनर लावल्याचे समर्थन करत, “यात चुकीचे काय आहे? ती चांगलीच गोष्ट आहे,” असे राऊत म्हणाले. ‘मी राहुल गांधींचा पहिला समर्थक’ राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना राऊत म्हणाले, “जेव्हापासून राहुल गांधी राजकारणात आले आहेत, तेव्हापासून मी त्यांचा समर्थक आहे. जेव्हा देशातील लोक त्यांना वेड्यात काढत होते आणि ‘पप्पू’ म्हणत होते, तेव्हा मीच पहिला माणूस होतो, ज्याने ठणकावून सांगितले होते की राहुल गांधी हाच या देशाचा पहिला नेता आहे.” पोलीस आयुक्तांच्या नेमणुकीवर गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. “राज्यातील प्रमुख शहरांमध्ये, विशेषतः पुणे आणि नागपूरमध्ये फडणवीस आणि शहा यांनी आपले मर्जीतील पोलिस आयुक्त नेमले आहेत,” असा आरोप करत राऊत यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हेही वाचा.. पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी राडा: ABVP-NSUI भिडले; विरोधकांकडून भाडोत्री गुंडांचा वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेस-एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सविस्तर वाचा
Source link
राहुल गांधींचा कार्यक्रम उधळण्याची भाषा म्हणजे दहशतवाद:संजय राऊतांचा भाजप-ABVP वर हल्लाबोल, फडणवीस-शहांवरही केले गंभीर आरोप