![]()
भारतातील शेती मोठ्या प्रमाणात निसर्गावर अवलंबून असल्याने पाऊस, बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत येतो. या परिस्थितीत एसआरटी (सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक) शेतीचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनी विनामशागत शेतीचे तंत्रज्ञान विकसित करून शेतक
.
प्रगतशील शेतकरी सुधाकर खंडागळे व भास्कर खंडागळे यांच्या शेतीला भेट दिल्यानंतर भडसावळे यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. यावेळी अनुराधा भडसवळे, अनिल नेवाळकर, मैत्री नेवाळकर, देविदास देसाई, शरद पुजारी आदी उपस्थित होते. भडसावळे म्हणाले, पारंपरिक शेतीमुळे उत्पादन खर्च वाढत असल्याने शेती परवडत नाही. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे गरजेचे आहे. ‘तण खाई धन’ऐवजी ‘तण हेच धन’ अशी मानसिकता निर्माण झाली पाहिजे. विनामशागत शेतीत मागील पिकाचे अवशेष जमिनीतच ठेवले जातात. हे अवशेष कुजताना त्यावर कार्य करणारे सूक्ष्मजीव जमिनीची जैविक मशागत करतात. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहण्यास मदत होते. यंत्र किंवा बैलांच्या मशागतीचा खर्च वाचून उत्पादन वाढण्यास मदत होते, असा दावा त्यांनी केला.
भडसावळे यांचे अमेरिकेतून शिक्षण, शेतीमध्ये नवे प्रयोग अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या चंद्रशेखर भडसावळे यांनी आधुनिक संशोधन, स्थानिक परिस्थिती आणि पारंपरिक ज्ञान यांची सांगड घालत शेतीकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘कृषिरत्न’ पुरस्काराने गौरविले. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची संकल्पना रुजविण्यातही त्यांचे योगदान असून, त्यांच्या प्रयोगांमुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या पद्धतींची दिशा मिळाली आहे.