![]()
शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून काही ठिकाणी पॅच व्यवस्थित लावण्यात आलेले नाहीत. परिणामी चालकांची वाहन चालवताना प्रचंड कसरत होत आहे. यावर तातडीने महापालिका व बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र एकाच वर्षात या रस्त्यांवर खड्डे पडले. त्यामुळे तपासणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चमूला पाचारण करण्यात आले. या तज्ज्ञांनी रस्त्याचे नमुने घेतले. तपासणीअंती काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला. मात्र अनेक डांबरीकरणाचे रस्ते पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले. यात मध्यवर्ती बस स्थानक ते जयहिंद चौक, कौलखेड ते रेल्वे स्टेशन आदींचा समावेश आहे. मात्र गांधी रोड, गांधी चौक, मोठ्या पुलावरून जयहिंद चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेसमोरील व मोठ्या पुलावरील खड्डे पॅच टाकून बुजवण्यात आले. मात्र याच भागात अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. परिणामी चालकांना वाहन चालवताना त्रास होतो. धार्मिक सण, उत्सवांच्या काळात पॅचिंगचे काम हमखासपणे होते. मात्र हे रस्ते दीर्घकालीन टिकण्यासाठी यावर खड्डे न पडण्यासाठी नव्याने रस्ता का तयार करण्यात येत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. वारंवार खड्डे बुजवण्याच्या कामानिमित्ताने कंत्राटदारांना पोसण्याचे काम होत असून यावर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सिमेंट रस्त्यावर खड्डे गांधी चौकात असलेल्या चौपाटीकडे जाण्यासाठी चार मार्ग आहेत. चौपाटी परिसरातील खाद्यपदार्थ, मेडिकल स्टोअर्स, पुस्तके, कापड, मोबाईल फोनसह अन्य साहित्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे या परिसरात कायम वर्दळ असते. अनेक जण रस्त्यावरच दुकाने थाटतात. महापालिका नेहमी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवते. आता तर चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहनचालकांना सावधपणे जावे लागते. सोबत लहान मुले असल्यास तर जास्त जपून गाडी चालवावी लागते. त्यामुळे महापालिकेने चौपाटी परिसरातील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
Source link
समस्या:मुख्य रस्त्यांवरच खड्डे; वाहन चालकांची कसरत, मनपाने दखल घेण्याची मागणी