![]()
श्रीरामपूर शहरात काही काळापासून अराजकता सुरू झालेली आहे. कोणी जर धर्माच्या नावाखाली अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी सर्वात पुढे रामगिरी महाराज असेल, असा विश्वास महंत रामगिरीजी महाराज यांनी श्रीरामपूरवासियांना दिला. सरला बेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानाचे मठाधिपती गुरूवर्य रामगिरीजी महाराज यांनी योगीराज सद्गुरू श्री. गंगागिरी महाराज १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये रोखठोक मत मांडले. प्रत्येकाने आपल्या धर्माचे कार्य केले पाहिजे, आपल्या धर्माचा स्वाभिमानदेखील ठेवला पाहिजे. मात्र इतर धर्माचा आदरदेखील केला पाहिजे. धर्माच्या नावाखाली अन्याय, अत्याचार होऊ नये. अराजकता निर्माण करण्यासाठी हा धर्म नाही. हा धर्म अराजकता शिकवीत नाही. सर्वांनी लक्ष देऊन ही अराजकता थांबवली पाहिजे, असेही ते म्हणाले. समाजात शांतता, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून सर्व विकासकामे पूर्ण झाल्यावर सरला बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरला बेट विकासाच्या आराखड्याच्या माध्यमातून सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौरऊर्जा यासह विविध कामे सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Source link
श्रीरामपुरातील अराजकतेला विरोधासाठी सर्वात पुढे राहू:महंत रामगिरीजी महाराज यांनी दिला विश्वास