![]()
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘जनगणना २०२७’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे. त्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘जनगणना २०२७’ ही केवळ आकडेवारीची नोंदणी नाही, तर शाळा, रुग्णालये आणि विविध कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. राज्यातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा यासाठी नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र राज्यात १ मे रोजी सुरुवात झाली आहे. ‘स्व-गणना’ प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने https://se.census.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून, नागरिकांनी या संकेतस्थळाचा वापर करून सोयीनुसार अद्ययावत माहिती भरावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘स्व-गणना’ टप्प्यानंतर, १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक गृहभेटी देणार आहेत. ते प्रत्यक्ष माहिती संकलित करतील. यावेळी नागरिकांनी प्रगणकांना संपूर्ण सहकार्य करावे. दिलेली माहिती अत्यंत गोपनीय असून ती कायद्याने सुरक्षित राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अधिकाधिक प्राधान्याने संबंधित माहिती लवकरात लवकर भरून द्यावी असे देखील त्यांनी सांगितले.
या माहितीचा वापर राज्याच्या विकास आणि नियोजनासाठी केला जाईल. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत एकजुटीने सहभागी होऊन ‘स्व-गणना’ करावी, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी उपायुक्त आणि शहर जनगणना अधिकारी विजय लांडगे, सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.