पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भातील वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पडदा टाकला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कालच्या “ऑफर
.
नेमका ‘कॉन्टेक्स्ट’ काय होता? कोल्हेंनी मांडली बाजू
आज पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “बऱ्याचदा असं होतं की एखादी न्यूज किंवा ब्रेकिंग न्यूज ही ठराविक टायटलमुळे चालते, पण त्यामागचा मूळ कॉन्टेक्स्ट सांगितला जात नाही. काल एका पत्रकार बांधवाने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात प्रश्न विचारला होता आणि त्यावरच मी सविस्तर भूमिका मांडली होती.”
देवेंद्र फडणवीस यांना ‘इन्फ्रा मॅन’ का म्हटले?
रेल्वे प्रकल्पाचा इतिहास सांगताना कोल्हे म्हणाले, “पुणे-नाशिक रेल्वेच्या पहिल्या अलाईमेंटच्या वेळी ‘एमआरआयडीसी’ची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यांनी या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती दिली होती. त्यामुळेच मी त्यांचा ‘इन्फ्रा मॅन’ असा उल्लेख केला. संगमनेर, सिन्नर, नाशिक, जुन्नर, राजगुरुनगर येथील ग्रामस्थांची आणि नागरिकांची जी मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करत होतो. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता.” एखाद्या मराठी माणसाचे नाव दिल्लीच्या वर्तुळात ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून आदराने घेतले जात असेल तर ती राज्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अभिमानाचीच बाब आहे, असेही ते म्हणाले.
रेल्वे प्रकल्पातील खोडा आणि ‘ऑफर’चा तिढा
कोल्हे यांनी प्रकल्पातील तांत्रिक अडचणींवर बोट ठेवले. हा प्रकल्प आधी एमआरआयडीसीकडे होता, मात्र नंतर तो अचानक रेल्वे मंत्रालयाकडे देण्यात आला. संसदेत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, खोडद येथील ‘जीएमआरटी’ने (GMRT) या रेल्वे अलाईमेंटवर आक्षेप नोंदवला आहे.
काल कोल्हे यांनी याच पार्श्वभूमीवर म्हटले होते की, “ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि मी (अमोल कोल्हे) पक्ष बदलला तरच हा प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार असेल, तर ही योजना विकासासाठी आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव आणून त्यांचे पक्षांतर करण्यासाठी आहे?” याच दबावाच्या राजकारणावर खोचक टोमणा मारताना त्यांनी “अशी कोणतीही ऑफर आलेली नाही, आली तर भविष्यात विचार करू” असे म्हटले होते, ज्याचा केवळ राजकीय अर्थ काढला गेला.
पवार साहेब सांगतील तेच धोरण
ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर शरद पवार गटाचे खासदारही फुटणार अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यावर कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केले, “पवार साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, आमची हीच स्वच्छ भूमिका आहे. पक्षात राहून आमच्यामध्ये असे काही गट आहेत हे आम्हालाच माहीत नसतं, पण सूत्रांना मात्र माहीत असतं. अशा चर्चा घडवून आणणारी सूत्रे कोण आहेत, ती आधी शोधली पाहिजेत. आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत.”
दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानाचा मूळ रोख हा पक्षांतराकडे नसून पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी होता, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांपासून त्यांच्या कथित संभाव्य बंडाविषयी सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
संबंधित बातमी वाचा…
‘मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन’:अमोल कोल्हेंचे सूचक विधान, मुख्यमंत्र्यांचेही ‘इन्फ्रा मॅन’ म्हणत केले कौतुक

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि जोरदार टीका केली. मात्र, यानंतर आणखी एक धक्का ठाकरेंना बसला, तो म्हणजे सचिन अहिर यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सूचक विधान करून सर्वांच्या भाव्या उंचावल्या आहेत. “मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन,” असे विधान त्यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी