राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा वेग घेण्याची शक्यता असून सत्ताधारी शिवसेनेचे ‘ऑपरेशन 3.0’ सुरू झाले आहे. लवकरच एक मोठा ‘महाभूकंप’ पाहायला मिळेल, असा खळबळजनक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत केला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या घंटानाद
.
ऑपरेशन 3.0 सुरू, महाभूकंप होणार
उद्धव ठाकरे गट सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर ‘पैसे घेऊन गेल्याचा’ आरोप संजय राऊत करतात. यावर बोलताना शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला. “दरवेळेला कुणी पक्ष सोडून गेला की, संजय राऊत त्याला वेश्या, गद्दार म्हणतात किंवा त्याचा लिलाव झाल्याचा आरोप करतात. या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय? स्वतःचे अपयश लपवण्यासाठी ते असे आरोप करत आहेत. माणसं घरातून फुटतातच का, हे त्यांनी सांभाळायला हवे.”
याच मुद्द्यावर बोलताना शिरसाट यांनी मोठा दावा केला की, “आमचे ‘ऑपरेशन 3.0’ सुरू झाले आहे. आम्ही सध्या सॅम्पल चेक करत आहोत. काही दिवसांतच तुम्हाला त्याचे परिणाम पाहायला मिळतील. राज्यात महाभूकंप होणार आहे. हे ऑपरेशन कधी करायचे आणि किती लोकांचे करायचे, याचा आकडा आणि निर्णय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील.”
उद्धव ठाकरेंना आंदोलनात साथ मिळणार नाही
राम मंदिरातील चोरीच्या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात ‘घंटानाद’ आणि ‘रामरक्षा आंदोलन’ पुकारले आहे. यावर शिरसाट यांनी कडाडून टीका केली. “मुळात यांनी हिंदुत्व सोडल्यामुळे त्यांच्या या आंदोलनाला कोणताही प्रतिसाद मिळणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता या आंदोलनात त्यांच्यासोबत नसतील, त्यामुळे त्यांना एकट्यालाच हे पेलावे लागेल. जे लोक घरासमोर हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना तुरुंगात टाकत होते, त्यांच्यावरच आज गल्लोगल्ली जाऊन हनुमान चालिसा वाचण्याची वेळ आली आहे.”
राम मंदिरातील चोरी दुर्दैवी असून त्यात आठ जणांना अटक झाली आहे. या घटनेचे कुणीही समर्थन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साटम प्रकरण आणि राज ठाकरेंच्या पत्रावर स्पष्टीकरण
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवर आमदार अमित साटम हसल्याच्या प्रकरणावर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली. “साटम यांच्या व्हिडिओबाबत मला पूर्ण कल्पना नाही, पण जर तसे घडले असेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना निश्चित समज दिली असावी. आता हा विषय इथेच संपायला हवा. राज्यात पावसाचे मोठे संकट आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
राज ठाकरे यांनी ‘संस्कृतीचा ऱ्हास’ होत असल्याच्या केलेल्या विधानावर शिरसाट म्हणाले, “महाराष्ट्रात एकच पक्ष नाहीये. उबाठा (UBT) चे लोक टीव्हीवर येऊन शिव्या देतात, ते संस्कृतीचे जतन आहे का? एखाद्याने हसणे म्हणजे संस्कृतीचा ऱ्हास आणि दुसऱ्याने शिव्या देणे ही संस्कृती, असा दुजाभाव करता येणार नाही. ‘आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ ही भूमिका कुणाचीही नसावी. साटम यांचे चुकलेच, पण दुसऱ्यांचेही बघा.”
किशोरी पेडणेकर आणि रितू तावडे वादावर प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेत महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात झालेल्या वादावर शिरसाट यांनी महापौरांची पाठराखण केली. “महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांचे एक प्रोटोकॉल असतात. त्या प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन महापौर दालनात हेरगिरी करणे किंवा फोटो काढणे योग्य नाही. याप्रकरणी महापौरांनी रीतसर पोलीस तक्रार केली असून लवकरच त्याचा सोक्षमोक्ष लागेल.”
एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना शिरसाट म्हणाले, “मुख्यमंत्री गेले 3-4 दिवस आजारी होते, त्यांना अशक्तपणा आणि ताप होता. सतत काम आणि झोपेचा अभाव हे त्याचे कारण आहे. ते आता रुग्णालयात असून त्यांना 3 दिवस तिथेच राहावे लागेल. त्यांचा काश्मीर दौराही रद्द करण्यात आला आहे. मात्र, रुग्णालयातूनही ते राज्याच्या पावसाचा आणि दुष्काळाचा आढावा घेत आहेत; शांत बसणे हा त्यांच्या स्वभावात नाही,” अशी माहितीही त्यांनी दिली.
संबंधित बातमी वाचा…
साकीनाका मॅनहोल दुर्घटना:अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचे फडणवीसांना खरमरीत पत्र, तर राऊतांचा ‘मौत के सौदागर’ म्हणत घणाघात

साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर घटनेवर भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम हे हसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपला ‘मौत के सौदागर’ म्हणत लक्ष्य केले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
