![]()
आसक्तीचा त्याग करून अनित्य, दुःख आणि अनात्म या तत्त्वांचे चिंतन करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रियभाव आणि आसक्तीचा अतिरेक कमी होतो, तेव्हा शोक आणि भय यांचाही अंत होतो, असे प्रतिपादन भन्ते शीलवंशलंकार यांनी केले.
.
अंकुर बनसोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील बुद्ध टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भिक्खू सीलवंसलंकार, मनपाच्या माजी सभापती प्रभा आवारे, सम्यक धम्मदूत ट्रस्टचे सचिव पा. ना. दंदे, समाजसेवक कैलास वाकोडे, नयन मोंढे उपस्थित होते. भन्तेजी पुढे म्हणाले बनसोड कुटुंबीयांनी धम्माची कास धरली. धम्मानुसार आचरण करीत राहिल्याने या कुटुंबातील सदस्यांना अनित्य, दुःख व अनात्म या तत्त्वांचे आकलन झाले. अर्थात या सर्वांनी जीवनातील मोठ्या दुःखांवर मात करून उन्नतीच्या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे. दरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्मृतीशेष अंकुर बनसोड यांच्या स्मरणार्थ ‘एक वृक्ष, एक आठवण सृष्टीचा केंद्रबिंदू पर्यावरण’ या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपणही यावेळी करण्यात आले. भिक्खू सीलवंसलंकार यांच्या हस्ते यावेळी बोधी वृक्ष व फणसाचे झाड लावण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन वृक्षमित्र प्रवीण वासनिक यांनी केले. आभार आयोजक हर्षल बनसोड यांनी मानले. कार्यक्रमाला बुद्ध टेकडीचे काळजीवाहक रंजन खिल्लारे, डॉ. संजय खडसे, पराग टोकसे, अमिता टोकसे, अनिल हिरेखन, अशोक खंडारे, राहुल साळुंके, अवधूत मोहोड, गणेश निशांनराव, डॉ. राजेंद्रसिंह ठाकुर, विश्वनाथजी भोगे, वसंतराव दहाट, शेषराव धंदर, पंकज गोपकर, चोरपगार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.