![]()
महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात 24 तासांत 18, तर नाशिकमध्ये 18.4 मिमी पाऊस झाला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसाठी 6 जुलैपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. आज राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी रेड अलर्ट :
पुणे, सातारा, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर. यलो अलर्ट :
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, धुळे, नंदुरबार, अकोला. ऑरेंज अलर्ट :
हिंगोली, नागपूर, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, अमरावती.
पेरणीची घाई नको, 2-3 दिवस थांबावे लागेल डॉ बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ चांगला पाऊस पडल्यानंतर जमिनीत योग्य वाफसा येणे गरजेचे आहे, जेणेकरून बियाणे व्यवस्थित मातीत पडेल. पाऊस थांबल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसांनी पेरणीची कामे हाती घेता येतील. ज्या भागात जास्त पाऊस झाला आहे त्या ठिकाणी चिखलात पेरणी करणे टाळावे. भाताची रोपे लावली जातात, परंतु अतिपावसामुळे ती वाहून जाण्याची भीती असते. कोकण पट्ट्यात सध्या खूप जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी अजून किमान 8 दिवस वाट पाहावी लागणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मदतीने पीक लागवडीचे नियोजन अधिक फायदेशीर ठरेल.
शक्यतो दोन दिवस घरीच राहा- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसह राज्यभरात पुढील दोन दिवस तीव्र वादळ आणि अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो दोन दिवस घरीच राहावे. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या भागांत 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन दर तीन तासांनी मोबाइलवर एसएमएस अलर्ट पाठवत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या 24 तास तैनात आहेत. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
Source link
आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस:बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट