Headlines

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड, 7 जुलैच्या विशेष सभेकडे लक्ष




भंडारा – स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे दाखल केला आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होतो की बारगळतो? याकडे नगरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 17 सदस्यीय लाखनी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 अशा दोन टप्प्यात पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, भाजपा 6, काँग्रेस 2 व अपक्ष 1 असे एकूण 17 नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित असल्याने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्रिवेणी पोहरकर यांची निवड झाली होती. त्यानंतर उपाध्यक्ष प्रदीप तितीरमारे यांनी राजीनाता दिल्यानंतर भाजपच्या लता रोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विद्यमान नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगरपंचायतीच्या कारभारात लोकशाही पद्धतीने काम करण्याऐवजी एकतर्फी व मनमानी पद्धतीचा अवलंब केला. निर्णय प्रक्रियेतून डावलल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. त्यांनी अनेकदा नगरसेवकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. नगरपंचायतीत सामूहिक नेतृत्वाच्या तत्वाला हरताळ फासून सर्व अधिकार नगराध्यक्षांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नगराध्यक्षांचे पती हे नगरपंचायतीच्या कारभारात प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करतात. अध्यक्षांच्या एकतर्फी व मनमानी कारभारामुळे नगरपंचायतीमध्ये सुसंवाद, सहकार्य आणि लोकशाही मूल्यांना बाधा पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनावर विपरित परिणाम झाला आहे. या सर्व बाबींमुळे 13 नगरसेवकांनी त्यांना नगराध्यक्ष पदावरून दूर करण्यासाठी 1 जुलैला जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावेळी संदीप भांडारकर, राजेश निंबेकर, महेश आकरे, अश्विन धरमसारे, भूपेंद्र धरमसारे, सचिन भैसारे, प्रदीप तितीरमारे, विपुल कांबळे, विभा हजारे, कांता निर्वाण, निशा मोहनकर, सविता सोनवाणे, सारिका बशेशंकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष सभेचे आयोजन मंगळवारी लाखनी नगरपंचायतीच्या 13 नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर मत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जुलैला दुपारी 12 वाजता नगरपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे नगर सेवकांची पळवापळवी होते की, तटस्थतेची भूमिका घेतली जाते, याकडे लाखनी वासियांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *