![]()
मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकासाठी (डिलिमिटेशन बिल) आवश्यक असलेला बहुमताचा आकडा भाजप सरकार कितीही पक्ष आणि खासदार फोडले तरी गोळा करू शकत नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर भाजपच्याच लोकांनी मोठी लूट केली असून, या कथित घोटाळ्याविरोधात आजपासून शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्ही खऱ्या हिंदुत्वासाठी आंदोलन करत असून सत्ताधाऱ्यांनीही यात सामील व्हायला हवे. आम्ही हिंदुत्व सोडले, अशी टीका करणाऱ्यांना राम मंदिरात पडलेला दरोडा दिसत नाही का? अयोध्येत सीतामातेचे मंगळसूत्र चोरले गेले असून, ही चोरी कोणत्याही बाहेरील व्यक्तीने केली नसून, तेथील विश्वस्त आणि भाजपशी संबंधित लोकांनीच केली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच राम मंदिरातील या कथित लुटीचे नेतृत्व स्वतः पंतप्रधान करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. हा पापाचा पैसा कुणालाही पचणार नाही संजय राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडे केवळ केंद्रीय तपास यंत्रणा आणि राम मंदिरातून लुटलेला पैसाच आहे. कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या गोळा करून अयोध्येत कार्यक्रम साजरे करण्यात आले होते. हा पापाचा पैसा कोणालाही पचणार नाही. सध्या अधिवेशन सुरू असून विरोधकांना रोज पक्षबदलासाठी ऑफर्स दिल्या जात असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, माणसाला किती हव्यास असावा? ज्याला कुठे थांबायचे हे कळत नाही, त्याचा अंत निश्चित असतो, असे सांगत पक्ष फोडणारे हे सरकार लवकरच कोसळेल, असा इशारा त्यांनी दिला. मोदी, शहा, फडणवीस काय अमर आहेत का? संजय राऊत म्हणाले की, या पृथ्वीतलावर राम आणि कृष्ण हे आले आणि गेले, महाभारत जिंकल्यानंतर त्यांनाही आपला देह सोडावा लागला. मग मोदी, शहा, फडणवीस किंवा शिंदे हे काय अमर आहेत का? प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते.
Source link
राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?:खासदार संजय राऊत यांचा भाजपवर घणाघाती हल्ला