Headlines

आमचा पक्ष एकसंध, सर्व नाराजी दूर होतील!:हसन मुश्रीफांचा दावा; अर्थखाते, दादा भुसेंवरील आरोप आणि अलमट्टी धरणावरही स्पष्टोक्ती




राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, महायुतीमधील अर्थखात्याचा तिढा आणि मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप या सर्वच मुद्द्यांवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध असून सर्व नेत्यांची नाराजी लवकरच दूर होईल’, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. प्रफुल पटेलांची नाराजी आणि राष्ट्रवादीतील एकजूट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर स्पष्टीकरण देताना मुश्रीफ म्हणाले, “पक्षात कोणतीही मोठी नाराजी नाही आणि जी काही थोडीफार नाराजी असेल ती लवकरच दूर होईल. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आमचा पक्ष कालही एकसंध होता, आजही एकसंध आहे आणि भविष्यातही तो एकसंधच राहील.” अर्थखाते राष्ट्रवादीलाच मिळणार का? महायुती सरकारमध्ये अर्थखात्यावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबत विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “सध्या मला याबाबत ठोस माहिती नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर यावर पुन्हा चर्चा सुरू होईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली. दादा भुसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पलटवार सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंत्री दादा भुसे यांच्या विभागावर आणि त्यांच्या ओएसडीवर (OSD) परवानगी देण्यासाठी लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांचे खंडन करताना मुश्रीफ यांनी आपल्या सहकारी मंत्र्याची पाठराखण केली. “मी काल नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री म्हणून गेलो होतो, त्यामुळे या विशिष्ट प्रकरणाची मला पूर्ण माहिती नाही. मात्र, महायुतीच्या नेत्यांवर केवळ आरोप करणे खूप सोपे असते, पण ते पुराव्यानिशी सिद्ध करणे फार अवघड असते. एखाद्या माणसाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी असे बेताल आरोप अनेक जण करत असतात,” असा पलटवार त्यांनी केला. महाराष्ट्र-कर्नाटक पाणी प्रश्न आणि अलमट्टी धरण पावसाळा सुरू झाला असला तरी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे अद्याप उघडलेले नाहीत, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “सध्या पाणी टंचाईचे संकट पाहता, आपणही आपल्या राज्यात पाण्याचे साठे ऑगस्टपर्यंत केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित कर्नाटक सरकारलाही भविष्यातील पाणी टंचाईचे संकट वाटत असावे, म्हणूनच त्यांनी धरणाचे पाणी रोखून ठेवले असण्याची शक्यता आहे. यात दोन्ही राज्यांचा पाण्याचे नियोजन करण्याचाच हेतू दिसतो.” नगराध्यक्ष अपात्रता प्रकरण नुकत्याच घडलेल्या काही नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत आणि त्यानिमित्ताने जयंत पाटलांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या भेटीगाठींवर ते म्हणाले, “नगराध्यक्ष हे पद थेट जनतेतून (लोकनियुक्त) निवडले जाते. एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याबाबतचा नेता मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. संपूर्ण शहराची निवडणूक पुन्हा घेण्यापेक्षा मार्ग काढण्यासाठी अशा भेटीगाठी होतात, यात काही गैर नाही.” एकूणच, हसन मुश्रीफ यांनी पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा फेटाळून लावत महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व काही आलबेल असल्याचा संदेश या संवादातून दिला आहे. दरम्यान, एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता. महायुतीतील खातेवाटपाबाबत बोलताना शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ म्हणाले होते की, “प्रसारमाध्यमांत अनेक चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटातील आमदार-खासदार एनडीएमध्ये येणार, अशा बातम्या सुरू आहेत. मात्र भविष्यात काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.” ‘अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळेल’ अर्थ खात्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले होते की, “अर्थ खाते निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल. आमच्या सर्व नेत्यांची बैठक झाली आहे. आम्ही पुन्हा अमित शहा आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत.” शिवसेनेच्या काही नेत्यांकडून अर्थ खाते राष्ट्रवादीकडे जाऊ नये, अशी भूमिका घेतली जात असल्याच्या चर्चांवर ते म्हणाले, “युतीमध्ये अशा प्रकारे चालत नाही. सुरुवातीला जे ठरले आहे, त्यानुसारच निर्णय व्हावा, ही आमची अपेक्षा आहे.” जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “ते नगरविकास विभागाशी संबंधित एका स्थानिक विषयासाठी भेटले होते. त्यापलीकडे काय चर्चा झाली, याची माहिती आम्हाला नाही.” ‘भाजप शब्द पाळेल’ महायुतीतील विश्वासाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, “भारतीय जनता पक्ष शब्द पाळणारा पक्ष आहे. आम्ही सर्वजण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसंध आहोत आणि तसेच राहणार आहोत.” राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. “20-21 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होईल. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. बियाण्यांची व्यवस्था करू आणि शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडू देणार नाही,” असेही त्यांनी म्हटले होते. हेही वाचा… भाजपचे मूळ कार्यकर्ते आजही सतरंज्याच उचलताहेत:सतेज पाटलांचा भाजपवर घणाघात, जयंत पाटलांच्या प्रवेशाबाबतही केला खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. ‘जयंत पाटील कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाहीत,’ असा ठाम विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच, सतेज पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या अंतर्गत अवस्थेवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेले, उपोषणाचा 21 वा दिवस:CJP संस्थापक दीपके म्हणाले -सोनम सरांना शिवीगाळ झाली, ओढत नेले; आंदोलक संतापले दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी सोनम यांना अपशब्द वापरले आणि बळजबरीने ओढत रुग्णालयात नेले. त्यांनी असाही दावा केला की, पोलिसांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *