![]()
अयोध्येचे राम मंदिर आणि इतर तिर्थस्थळांच्या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचार, चोरीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, शनिवारी नागपूर येथे रामरक्षा आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद अमरावतीतही उमटले. उद्धव ठाकरे यांनी केव्हाच हिंदुत्व सोडले म्हणत अमरावतीत भाजपने राजकमल चौकात सुंदरकांड केला. तर भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगढी येथे हनुमान चालिसा पठन केले. दोन्ही ठिकाणी झालेल्या वक्तव्यानुसार ठाकरे यांचे आंदोलन बेगडी असून त्यांनी सत्तेसाठी बऱ्याच तडजोडी केल्या, अशी टीका यावेळी करण्यात आली. भाजपच्या मते शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून सत्तेच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांशी हात मिळवणी केली. त्यामुळे त्यांना आता सन्मती आणि सद्बुद्धी द्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, किरण पातुरकर, तुषार भारतीय, नितीन गुडधे, चेतन पवार, चेतन गावंडे, नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. शनिवारी दुपारी या सर्वांनी सुंदर कांडचे पठण करीत रामनामाचा जयघोष केला. यावेळी खासदार डॉ. बोंडे यांच्यासह, आमदार पोटे व प्रवक्ते कुळकर्णी यांनी मांडणी केली. सत्तेत असताना उध्दव ठाकरे यांनी आमदार रवी राणा व त्यांच्या अर्धांगीनी माजी खासदार नवनीत राणा यांना मुंबईच्या तुरुंगात डांबले होते. डॉ. बोंडे यांची कडाडून टीका यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, त्यांच्या कार्यकाळात पालघरमध्ये साधूंची हत्या झाली. लॉकडाऊनच्या नावाखाली मंदिरांना कुलुपे ठोकण्यात आली. आता सत्ता गेल्यावर आणि स्वतःचा पक्ष खिळखिळा झाल्यावर त्यांना पुन्हा रामाची आठवण आलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पाठ म्हणणे तर सोडा, नीट वाचून तरी दाखवली पाहिजे. त्यांना रामरक्षा वाचतादेखील येत नाही आणि जगाचे नियंत्रण करणाऱ्या रामाची रक्षा करायला हे दुबळे लोक निघाले, याचे आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले.
Source link
उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाचे अमरावती शहरात तीव्र पडसाद:भाजपचा सुंदरकांड, नवनीत राणा यांचे हनुमान चालीसा पठण