Headlines

कुत्र्यांचा हल्ला, मच्छरांचा उद्रेक; साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त:साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती; नगरपालिकेचे दुर्लक्ष‎




मूर्तिजापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्य व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहर पोलीस स्टेशन परिसरासह विविध भागात शेकडो भटके कुत्रे मुक्तपणे वावरत असून, स्थानिक नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने उष्णता व उकाडा वाढला आहे. तसेच ढगाळ वातावरण आणि अयोग्य ड्रेनेज सिस्टिममुळे सांडपाण्याचे डबके साचून मोठ्या प्रमाणावर मच्छरांची उत्पत्ती होत आहे. यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, ताप आणि खोकला आदी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या सर्व गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून नगरपालिका प्रशासन केवळ पेव्हर ब्लॉक आणि बांधकामांसारख्या मलिदा देणाऱ्या कामांमध्ये व्यस्त असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. रात्री श्वान करतात पादचाऱ्यांचा पाठलाग मूर्तिजापूर पोलिस ठाण्याच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी हे श्वान रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्यांचा पाठलाग करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. औषध फवारणीचे साहित्य कार्यालयात धूळखात? नगरपालिकेत फवारणीसाठीची औषधे उपलब्ध असूनही प्रशासनाकडून शहरात फवारणी केली जात नाही . लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसारच कारभार चालत असून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *