Headlines

घाटकोपरमध्ये बकरा कुर्बानीवरून तणाव:सागर पार्क सोसायटीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; किरीट सोमय्या, माधुरी मिसाळ मैदानात




मीरा रोडमधील घटनेनंतर आता मुंबईतील घाटकोपर परिसरात बकरा कुर्बानीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचे दिसत आहे. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बकरा कुर्बानीची परंपरा सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. मात्र यंदा अचानक मुंबई महानगरपालिकेने मध्यरात्री कुर्बानीची परवानगी रद्द केल्याने नवीन वाद निर्माण झाला. या निर्णयानंतर सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्य राखीव पोलिस दलाची तुकडीही घटनास्थळी दाखल झाली आहे. सोसायटीमधील काही नागरिकांनी कुर्बानीला विरोध दर्शवल्यानंतर पोलिस आणि स्थानिकांमध्ये काही काळ वादाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे परिसरात तणाव वाढू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. संबंधितांकडून आम्ही सोसायटीच्या आवारात कुर्बानी करणार नसून पालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोसायटीचे नाव खराब करण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे घाटकोपरमध्ये राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सागर पार्क सोसायटीत भेट देणार असल्याचे सांगितल्यानंतर परिसरातील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली. सोमय्या यांनी दावा केला की, कुर्बानीसाठी आणलेल्या 31 बकऱ्यांपैकी 23 बकरे मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले आहेत. यापुढे या ठिकाणी एकाही बकऱ्याची कुर्बानी होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कुर्बानीसाठी पालिका योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरक्षा राखणे हे पोलिसांचे काम आहे, प्रत्येक ठिकाणी आम्हालाच जावे लागते, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही या वादावर प्रतिक्रिया देताना निवासी सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे कत्तलखाने तयार करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. धार्मिक सण साजरे करण्यास कुणाचाही विरोध नाही, मात्र ज्या ठिकाणी लोक राहतात त्या निवासी भागात अशा प्रकारे प्राण्यांची हत्या होणे योग्य नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे या विषयावरील राजकीय चर्चा आणखी वाढल्या आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आयुक्तांना पत्र या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, पुणे पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा धार्मिक कार्यक्रमांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मीरा रोडच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी पुण्यातही काही कट्टर प्रवृत्तीचे घटक निवासी भागांमध्ये अशा कार्यक्रमांच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद केले. तसेच महिलांशी गैरवर्तन, अश्लील वर्तन आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस, महापालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *