![]()
मनपात सत्ता मिळवणाऱ्या भाजपला आता पक्षातील माजी आमदारांकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या आश्वासनाला हरताळ फासला जात असून मनपात अधिकारी, ठेकेदार आणि पीएमसीची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांनी सोमवारी (29 जून) केला. मनपा आयुक्त कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचाही दावा त्यांनी केला. यातून मनपातील भाजप सत्ताधारी विरुद्ध भाजप नेते असा सुप्त राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचेच आमदार प्रशांत बंब यांनी प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. आता संजय केणेकर यांनी आयुक्तांसह महापौर समीर राजूरकर यांची भेट घेत तीच री ओढल्याने खळबळ उडाली आहे. 62 नगरसेवकांचे बळ असूनही बैठकांमध्ये ‘ब्र’ नाही मनपात भाजपचे 62 नगरसेवक आहेत. महापौर, स्थायी समिती सभापती अशी महत्त्वाची पदेही भाजपकडेच आहेत. आतापर्यंत सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभा झाल्या. मात्र, कोणत्याच सभेत भाजप नगरसेवकांकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा आला नाही किंवा प्रशासकीय राजवटीतील ऑडिटचा कोणताही प्रस्ताव पदाधिकाऱ्यांनी आणला नाही. गटातटाचे राजकारण जोमात मनपात भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर पक्षात सर्वकाही आलबेल आहे असे मुळीच नाही. इतर पक्षांप्रमाणेच गटातटाचे राजकारण आता भाजपमध्येही जोर धरत आहे. आपल्या समर्थक नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे होणे, आपल्या जवळच्या ठेकेदारांची बिले निघणे किंवा कार्यकर्त्यांचे मनपात पुनर्वसन करण्यासाठी नेत्यांची मनपातील वर्दळ कायम सुरू असते. यातूनच दबावतंत्राचा वापर होत असल्याची दबक्या आवाजातील चर्चा आहे.
Source link
छत्रपती संभाजीनगर मनपात अधिकारी-ठेकेदारांची भ्रष्ट साखळी:भाजपचे माजी आमदार केणेकरांकडून भ्रष्टाचाराचे आरोप