Headlines

डबल ढोलकी सरकारने हातात घंटा देण्याचे काम केले:जरांगे पाटलांच्या उपोषणावरून विजय वडेट्टीवारांची टीका; सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी- लक्ष्मण हाके




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि मराठा अभ्यासक व जरांगे यांच्यात रात्री 10.30 वाजेपासून चर्चा सुरू झाली. अडीच तासांच्या चर्चेनंतर सरकारने सर्व मागण्या मान्य असल्याचे सांगत 2-3 दिवसांत त्यासंबंधी सूचनांचा शासननिर्णय काढू, असे आश्वासन दिले. त्यानंतर रात्री 1 वाजता जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.‎ यावर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्या एकंदरीत आंदोलनावर तसेच सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, डबल ढोलकी सरकारने पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसीच्या हातात घंटा देण्याचे काम सुरू केले आहे, असे मला दिसत आहे. काल जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यामध्ये सरकारकडून विखे पाटलांच्या आणि प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत निघाला, खरे तर या तोडग्यात 58 लाख ज्या काही नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे म्हणजेच ओबीसीमध्ये समाविष्ट करायचे, हा निर्णय काल झाला. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांची बाइट पाहिली, ते असे म्हणाले की आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. ओबीसीचे नुकसान करणार नाही. म्हणजे हाच सगळं डबल ढोलकी कारभार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ओबीसींची बाजू घ्यायची, दुसरीकडे विखे पाटलांनी करार करायचा, यात नेमका सरकारचा उद्देश काय आहे? दोघांना एकमेकांच्या विरोधात लढवायचे आहे? दोघांना एकमेकांच्या विरोधात उभे करायचे आहे आणि सत्तेची खुर्ची टिकवायची आहे. सत्तेची मजा चाखायची आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या सगळ्यात मी जरांगे पाटलांनाही सांगतो, हे लबाडाचे सरकार आहे, हे यावर विश्वास ठेऊ नका आणि ओबीसींनाही सांगतोय मी की सरकारची भूमिका कधीच तुमच्या बाजूने राहिलेली नाहीत. जो आत्ताचा जीआर काढला, तो जीआर हा ओबीसीच्या, बहुजनांच्या मुळावर उठणार आहे. कारण ओपनमध्ये कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवले नाहीये. म्हणजे या राज्यातील 85 टक्के लोकांना 50 टक्के आरक्षण आणि 15 टक्के लोकांना 50 टक्के आरक्षण ही भूमिका, हे सरकार कोणाच्या बाजूचे आहे, कोणासाठी काम करत आहे, हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे. म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेऊ नका. ओबीसीचे नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा आणि लवकरच याची घोषणा आम्ही करू, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी- लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके सरकारवर टीका करताना म्हणाले, मनोज जरांगे यांचे उपोषण कोणाचे तरी पॉलिटिकल कोअर सेट करण्यासाठी होते. हे नियोजित आंदोलन होते. जरांगे उन्हात बसले म्हणून या शासनाने ही तत्परता दाखवली. ही शासनाची तत्परता नव्हती, तर ती त्यांची लाचारी बघायला मिळाली, असे हाके म्हणाले. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, प्रसाद लाड यांचा अपमान जरांगे करत होते. याच वेळी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा जरांगे वेळोवेळी अपमान करत होते. यावेळी लाचार सरकार आम्हाला बघायला मिळाले. ओबीसी लोकांच्या वेदना आणि दुःख या सरकारला कधी दिसत नाही. मनोज जरांगेच्या आंदोलनाला बळी पडून जात पडताळणी करणाऱ्या समितीवर दबाव आणला तर ओबीसी त्याला प्रचंड विरोध करतील, असा इशारा हाके यांनी दिला आहे. संख्येच्या बळावर कास्ट सर्टिफिकेट दिली जाणार असतील तर असे बोगस सर्टिफिकेट इशू करणाऱ्या तहसीलदार कार्यालयावरती हल्ले करू, प्रसंगी कायदा हातात घेऊ. सरकार नवे कायदे करायला लागले तर आम्ही सगळ्या आस्थापनावरती पुढच्या कालावधीत हल्ले करू, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *