Headlines

दर्यापूर येथील अतिक्रमित सुरक्षा भिंतीसह जिना हटवला:जयस्तंभ चौकातील अतिक्रमणांवरही कारवाईचे संकेत‎




नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील रहिवासी परिसर असलेल्या काही भागात कारवाई करण्यात आली. अतिक्रमित जागांवर उभारण्यात आलेले जीने, पॅसेज, सुरक्षा भिंत तसेच इतर बांधकामांवर बुलडोझर चालवून नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. शहरात काही ठिकाणी अतिक्रमीत जागेवर बांधकाम करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना स्वखर्चाने अतिक्रमण हटविण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने नगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून शहरभर या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. दर्यापूर शहरातील इतर भागांमध्ये राहिलेली अतिक्रमणेही लवकरच हटविण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी दिला. तसेच जयस्तंभ चौक परिसरात काही बड्या व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्यावरही कोणताही दुजाभाव न ठेवता कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून मोहिमेचे स्वागत नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यापासून काही व्यापाऱ्यांकडून या कारवाईला विरोध होत असला तरी सर्वसामान्य नागरिकांकडून मोहिमेचे स्वागत केले जात आहे. मुख्य रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातांचे प्रमाणही वाढत होते.नगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्ते आता मोकळे होत असून वाहतुकीला दिलासा मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शहरातील उर्वरित अतिक्रमणांवरही अशीच कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *