![]()
पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत पती-पत्नीच्या वादातून पतीने घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत घरातील तीन पाळीव मांजरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मोहिनी दयानंद कसबे (वय ३६, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी आणि त्यांच्या पतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. ९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. याच वादातून पतीने घरातील साहित्याला आग लावली. आग लागल्यानंतर मोहिनी घाबरून घरातून बाहेर पळाल्या. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोहिनी यांनी पाळलेल्या तीन मांजरांचा मृत्यू झाला. तसेच, घरातील सर्व गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घराला आग लागल्याचे समजताच परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी ओतून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत मोहिनी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घर पेटवल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मोटारीची काच फोडून रोकड चोरी मोटारीची काच फोडून चोरट्यांनी ४२ हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४६ वर्षीय महिला खराडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी खराडी बाह्यवळण मार्गावर मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पिशवीत ठेवलेली ४२ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. सहायक पोलीस फौजदार एस कांबळे तपास करत आहेत.
Source link
पती-पत्नी वादातून पतीने घर पेटवले:3 पाळीव मांजरांचा मृत्यू, गृहोपयोगी साहित्याचे नुकसान