Headlines

पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले चांगली गोष्टय:अजितदादांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली; सुनील तटकरे काय म्हणाले?




राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज त्यांचा अर्ज भरण्यात आला आहे. त्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादा असताना झाल्याचेही म्हटले आहे. तसेच अजितदादांच्या विमान अपघातावरही भाष्य केले आहे. सुनील तटकरे म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार सक्रिय होणे पक्षासाठी महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि योग्य आहे. शेवटी संघटनेत काम करत असताना वेगवेगळी मते असू शकतात. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली झाली. पवार साहेबांसारखे 6 दशक देशाच्या राजकारणात एक प्रभाव असणारे नेतृत्व मिळाले. तसेच पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जायचे. त्यामुळे साहेबांची सुद्धा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुद्धा तशीच होती. अजितदादांनी देखील तीच पद्धत पुढे चालू ठेवली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बैठका झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, यात गौप्यस्फोट काही नाही. ही वस्तुस्थिती आहे. अजितदादांचा निधानापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली आहे. काही बैठकांना मी नव्हतो, पण बैठकीतले तपशील मला दादा सांगायचे. त्यामुळे फार मोठा गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरे यांनी केला असे काही नाही. उमेदवारी जाहीर करण्यात उशीर का होतो? प्रत्येक निवडणुकीला उमेदवारी जाहीर अगदी काही तास शिल्लक असताना केली जाते, असे का होते? यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, जेव्हा तीन पक्ष एकत्र निवडणुका लढवत असतात, तेव्हा जागावाटपावर चर्चा होत असते. काही जागांच्या बाबतीत प्रत्येक राजकीय पक्षाचे एक गणित असते ते मांडले जाते. तसेच सगळ्याच बाबतीत एकमत होत असते असे नाही. एनडीएमध्ये आमच्याकडे एक मोठे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाकडे अनेकवेळेला अनेक प्रश्न जात असतात. अमित शहा तिथे पूर्ण नियंत्रण करत असतात, ते सर्वांनाच अतिशय समान पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. यात कधी वेळ लागत असतो. कॉंग्रेस पक्षाने आत्मचिंतन करावे कॉंग्रेसवर टीका करताना सुनील तटकरे म्हणाले, आता त्यांना हातातोंडाशी आलेले गेले असे वाटत असेल, एक बघा चंद्रपूर महापालिकेत कॉंग्रेस पक्षाला बहुमत होते. आता कॉंग्रेस पक्षांतर्गत काय चालू आहे, मला माहीत आहे. पण त्यावर मला बोलावे असे वाटत नाही. पण बहुमत असताना सुद्धा ते त्यांचा महापौर करू शकले नाहीत. आता त्यावेळेला त्यांचा महापौर होऊ शकला नाही, त्यांनी काळाच्या ओघात जसा सूड उगवला जातो, तसा तो उगवला गेला की काय आणि त्याच्यातून जर काही नगरसेवक नॉट रिचेबल असतील तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करावे, असा खोचक सल्ला तटकरे यांनी दिला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताविषयी काय म्हणाले तटकरे? अजित पवारांच्या अपघाताला 5 महीने उलटून गेले, मात्र अद्यापही हा घात आहे की अपघात याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अशा पद्धतीचे विमान अपघात होतात, तर त्याच्या चौकशीची एक पद्धती केंद्र पातळीवर नक्की करण्यात आली आहे. त्या विभागाच्या मार्फत एक स्वतंत्र एक व्यवस्था स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने सीआयडीची चौकशी सुरुवातीला घोषित केली होती. त्याचबरोबर आम्ही सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे सीबीआयची देखील चौकशी सुरू करण्यात आली. शेवटी विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स आणि नेमके काय काय घडले याची तपशीलवार सखोल चौकशी होत असते. पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, आमच्याही मनात काही शंका आहेत, म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. सीबीआय चौकशीची मागणी केली. अमित शहा साहेबांना भेटलो, त्यांच्याकडेही मागणी केली. त्यामुळे तपास लवकर पूर्ण झाला पाहिजे आणि त्या तपासाचा तपशील राज्यातल्या जनतेसमोर आणि देशातल्या जनतेसमोर सुद्धा आला पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *