![]()
सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री, बागेश्वर यांच्या सारखे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे. अशोक खरातवर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले. पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला. राज्यात बुवा बाबांचे प्रस्थ वाढवण्याचे, त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या पार्श्वभूमीवर अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ‘वृक्ष तिथे छाया… बुवा तिथे बाया’ जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत असून बुलढाणा येथे श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विश्राम भवन येथे आज 20 एप्रिल रोजी शाम मानव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याची स्थिती व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य यावर त्यांनी भूमिका मांडली. पुढे बोलताना प्रा. मानव म्हणाले, काँग्रेसच्या काळात बुवा बाबांवर एफआयआर दाखल करताना पोलीस स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे तर आता सरकारच्या संमतीशिवाय काहीही करता येत नाही. खरातसारख्या भोंदू बुवा बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातूनच सुरू आहे. ते पुढे म्हणाले, बीजेपी मंत्रिमंडळातील एका मोठ्या मंत्र्यांने मुख्यमंत्री होण्यासाठी खरात बाबाकडे पूजा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यावर कारवाई झाली. वास्तविक पाहता धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा यांच्यावरही आरोप आहे. कायद्यानुसार या दोघांवर कारवाई करने सहज शक्य आहे. मात्र खरात सारखा न्याय या लोकांना लावण्यात आलेला नाही. खरात वाईट व इतर चांगले असे होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षापासून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रचार आणि अंमलबजावणी करण्यात येत नाही. अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. कामही सुरू झाले, मात्र फडणवीस यांनी नुसते झुलवत ठेवले. सरकारने या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. हा कायदा राबवायचाच नाही असे त्यांचे ठरले असल्याचे श्याम मानव म्हणाले. अधिकाऱ्यांवर, यंत्रणांवर फार मोठे दडपण आहे. अशी अवस्था आपण अख्या आयुष्यात कधी पाहिली नाही. काँग्रेसच्या काळात गुलाब बाबाचे भक्त शंकराव चव्हाण आणि सत्यसाईबाबा भक्त विलासराव देशमुख सारखे मोठे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करीत. आता साधा नगरसेवक येऊन काम बंद पाडतो. अलीकडच्या काळात जादूटोणाविरुद्ध कायद्याचा प्रचार प्रसार झाला असता तर खरात सारखा बाबा उदयास आलाच नसता. या प्रकरणात अनेक लोक अडकले त्याला जबाबदार राज्य सरकार असल्याचा घनाघात त्यांनी केला. रूपाली चाकणकर देखील आरोपीच खरात प्रकरणाची सुरुवात एका पत्रकारापासून झाली. ज्या पत्रकाराने आवाज उठवला त्याला फोन करून रूपाली चाकणकर यांनी दम भरला होता. आरोपीला सहाय्य करणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हा आहे.त्यामुळे रूपाली चाकणकर यामध्ये आरोपी आहे असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा सहभाग तपासला पाहिजे खरात वर ॲक्शन होण्याचे पुन्हा एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि रूपाली चाकणकर यांच्याशी असलेली जवळीक असू शकते. त्याचे संबंध कसे आहे हा पोलिस तपासाचा भाग आहे.भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री होण्यासाठी पूजा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष प्रकरणाकडे गेले व खरात वर कारवाई झाली असे श्याम मानव पत्रकार परिषदेत म्हणाले. या पत्रकार परिषदेला अ.भा. अंनिस राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, मराठवाडा संघटक किशोर वाघ,जिल्हा संघटक प्रमोद टाले, जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर,सुनील भाऊ जावंजाळ पाटील, दत्ताभाऊ सिरसाठ, महिला संघटक प्रतिभा भुतेकर, सचिव आशिष गवई, विवेक हिवाळे, सुमेध जाधव ,नानाभाऊ मोरे आदींची उपस्थिती होती.
Source link
भोंदू बाबांचे प्रस्थ सरकार पुरस्कृतच:'अंनिस'च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा