Headlines

महाराष्ट्र होरपळणार!:राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज




राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांची ओलांडली असून, पुणे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ होणार असल्याने पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत कडक उन्हाचे असणार आहेत. राज्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांत तापमानाचा पारा 45.3 अंशांच्याही पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघत आहेत. सद्यस्थितीत बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर असल्याने पुणे हवामान विभागाने नागरिकांना पुढील तीन दिवस आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील पाच दिवसांत पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उकाडा कमी होण्याचे चिन्ह नाहीत. उलट विदर्भात येत्या चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होऊन काही भागांत ‘यलो अलर्ट’ कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या उत्तरार्धात विदर्भाला पुन्हा एकदा तीव्र उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेची शक्यता सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्याने उत्तरेकडील राज्यांतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. आगामी काही दिवसांत विदर्भाच्या पाऱ्यात 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 ते 46 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वाढत्या उष्म्यामुळे विदर्भ पुन्हा एकदा होरपळून निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *