Headlines

महिन्याभरात पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाणार:जयंत पाटील यांनी वर्तवले भाकित, जुन्या ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना लगावला खोचक टोला




देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट ३ रुपयांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. “आज ९६ रुपयांना मिळणारा डॉलर महिन्याभरात १०० रुपयांवर जाईल, तर पेट्रोलचे दर १२० ते १३० रुपयांवर पोहोचतील,” असा इशारा त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाच्या दोन दिवसांतच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढून, प्रत्येकी ३ रुपयांनी महाग झाले आहेत. या महागाईवरून विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पेट्रोल-डिझेलची आणखी भाववाढ होणार असल्याची भविष्यवाणी केली. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली. नेमके काय म्हणाले जयंत पाटील? देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले, “कोरोनाच्या काळात सरकारने लॉकडाऊन लावला होता. पण आता देशापुढील आर्थिक संकट पाहता, परिस्थिती अशी निर्माण होईल की देशात आपोआपच लॉकडाऊन लागेल.” जेव्हा देशावर आर्थिक संकट येते, तेव्हा त्याचा पहिला फटका शेतकरी आणि शेतमजुरांना बसतो, त्यामुळे या संकटातून मार्ग कसा काढायचा यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाशिममध्ये ड्रम घेऊन हाणामारी; पेट्रोल पंपांवर रांगा पंतप्रधानांनी देशवासीयांना पेट्रोल-डिझेल आणि सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच दर वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, “इंधन टंचाईच्या भीतीने लोक पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत. वाशिममधील एका पेट्रोल पंपावर तर नागरिक चक्क ड्रम घेऊन डिझेल-पेट्रोलसाठी एकमेकांशी भिडले असून तिथे मारामारी सुरू असल्याचा व्हिडिओ मी स्वतः पाहिला आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जुन्या ट्विटची आठवण जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. “पंधरा दिवसांपूर्वी देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले होते की आपल्याकडे ६ महिने पुरेल इतका इंधन साठा आहे. त्याला महिनाही झाला नाही, तोच पंतप्रधानांनी नागरिकांना खर्च कमी करण्याचे आवाहन केले. २०१३ मध्ये जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अशीच भूमिका घेतली होती. “त्यावेळी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची आर्थिक व्यवस्था डबघाईला आल्याचे ट्विट केले होते. मात्र, आज तेच मुख्यमंत्री ‘पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा करू नका’ असे ट्विट करत आहेत,” असा टोला जयंत पाटलांनी लगावला. …तर सर्व मंत्रिमंडळ दुचाकीवर येईल! जयंत पाटील म्हणाले की, “आर्थिक काटकसरीचा भाग म्हणून पंतप्रधानांनी आपला ताफा कमी करत दोन गाड्यांवर आणला आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुचाकीवरून फिरायला लागलेत. आता याचेच अनुकरण राज्यातील इतर मंत्रीही करतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ दुचाकीवर येईल, अशी अपेक्षा करूया!”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *