![]()
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी संग्राम भंडारे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शाईफेक केली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. शाईफेक प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी लवांडे यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विकास लवांडे यांनी ट्विट करत म्हटले की, माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर दोन दिवस झाले 15 पैकी एकाही आरोपीला अद्याप पर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही पुण्यातील वापरलेल्या 3 चार चाकी गाड्या दोन रिवाल्वर काहीही ताब्यात घेतलेले नाही. गुन्हेगारांना पूर्णमोकळीक आहे. सत्ताधारी मंत्री व काही आमदार त्यांना जाहीरपणे पाठबळ देत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असा सवाल लवांडे यांनी उपस्थित केला आहे. संग्राम भंडारेंच्या केसलाही धक्का लागणार नाही- नितेश राणे दरम्यान, भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी संग्राम भंडारे यांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी म्हटले होते की, या महाराष्ट्रात मोठी संत परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. आमच्या संत आणि महाराजांकडे कोणीही वाकड्या नजरेने बघत असेल तर त्या सगळ्यांचे कार्यक्रमच होणार, ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. मला जशी ही बातमी समजली, मी बापूंना फोन केला आणि म्हटले की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयात बसलेले आहेत. तुमच्या केसलाही धक्का लागणार नाही, हा मी बापूला शब्द देऊन टाकला. माझ्या नावाने शिव्या घालत असतील, मला काहीही फरक पडत नाही. नितेश राणे या घटनेचे सूत्रधार- विकास लवांडे मंत्री नितेश राणे यांनी असे विधान केल्यानंतर विकास लवांडे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, माझ्यावर काल जो जीवघेणा हल्ला झाला, त्या संदर्भात फिर्याद देण्यात आली आहे, तरी देखील आरोपींना अटक झालेली नाही, त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या नाहीत, त्यांचे पिस्तूल जप्त करण्यात आले नाही. कारण या घटनेचे सूत्रधार आज बोलले आहेत, असे म्हणत त्यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Source link
माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना अद्यापही अटक नाही:सत्ताधारी मंत्र्यांचे गुन्हेगारांना जाहीर पाठबळ, विकास लवांडेंचा गंभीर आरोप