![]()
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असतानाच आता हवामानात अचानक बदल झाला आहे. मुंबईसह कोकणातील काही भागांत पुढील 3 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 23 मे रोजी सकाळी 7 वाजता जारी करण्यात आलेल्या ‘नाऊकास्ट वॉर्निंग’मध्ये मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दुसरीकडे पुण्यात मुसळधार पावसानंतर मेट्रो सेवेमधील मोठी त्रुटी समोर आली आहे. मेट्रोच्या एका कोचच्या छतामधून पाणी गळत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. कोचच्या आत थेट पाणी टपकत असल्याने काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला, तर काहींनी आसन बदलत गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मेट्रोच्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा दावा करणाऱ्या मेट्रो प्रशासनावर आता नागरिकांकडून टीका होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेत मेट्रो प्रशासनाकडून तांत्रिक तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 47 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच आता वातावरणात बदल होऊ लागला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता जाणवत आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ झाली आहे. पुढील काही तासांत मुंबईतील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, कोकणात मान्सूनपूर्व पावसाची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. रत्नागिरी, रायगड आणि परिसरातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत कोकणातील वातावरण आणखी बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता अधिकच वाढली आहे. कोकण किनारपट्टीवर अधूनमधून ढगांची दाटी आणि पावसाच्या सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. याचदरम्यान सातारा जिल्ह्यात पावसामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. सातारा-कराड मार्गावरील नागठाणे, उंब्रज आणि तासवडे टोलनाका परिसरात झालेल्या पावसादरम्यान वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. तुकाराम सिधु होनमाने असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय 65 वर्षे होते. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील रहिवासी होते. आपल्या मेंढ्यांसाठी भुईमूगाचे वेल गोळा करत असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी ते शेतातील झाडाखाली थांबले होते. अचानक जोरदार विजांचा लोळ खाली आला आणि झाडासह तुकाराम होनमाने यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील 2 दिवसांत ते आपल्या मूळ गावी परतणार होते. मात्र त्याआधीच या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर विजांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वातावरणात बदल कायम राहण्याची शक्यता दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत वातावरणात बदल कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणासह मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात, तर उर्वरित भागांत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली उभे राहू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि कोकणातील नागरिकांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार असून हवामान विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Source link
मुंबईकरांनो सावधान पुढील 3 तासांत मुसळधार सरींची शक्यता:मुंबईसह कोकणात सतर्कतेचा इशारा; पुण्यात मेट्रोच्या कोचमध्ये गळती