![]()
राज्यभरात आज बकरी ईद अर्थात ईद-उल-अधा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मुंबई, सोलापूर, नाशिक, भुसावळसह अनेक शहरांमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी सामूहिक नमाज पठण करत शांतता, बंधुभाव आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. यंदा विशेष म्हणजे बकरी ईद आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे अनेक ठिकाणी सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराचे चित्र पाहायला मिळाले. हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देत ऐक्याचा संदेश दिला. मुंबईतील विविध मशिदी आणि ईदगाह मैदानांमध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. नाशिकमध्येही ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव एकत्र आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशद्वारांवर तपासणी करण्यात आली. पिशव्या आणि साहित्याची कसून पाहणी केल्यानंतरच नागरिकांना मैदानात प्रवेश देण्यात आला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. भुसावळ शहरातील नवीन ईदगाह मैदानावर सकाळी सुमारे 8:30 वाजता ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाज पठणानंतर मुस्लिम समाजबांधवांनी देशात शांतता, जातीय सलोखा आणि एकात्मता कायम राहावी, अशी प्रार्थना केली. यासोबतच राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी, अशीही प्रार्थना करण्यात आली. अनेक ठिकाणी ईदनिमित्त गरजूंना मदत, अन्नदान आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपुरात कुर्बानी न देण्याचा निर्णय यंदाच्या ईदला आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अनेक भागांत विशेषतः पंढरपुरात मुस्लिम समाजाने एकादशीचा आदर राखत कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी धार्मिक सौहार्द अबाधित राहावे आणि कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये, यासाठी समाजबांधवांनी संयमाची भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यभरातून सामाजिक ऐक्याचा सकारात्मक संदेश गेला. विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनीही नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. परंपरेनुसार बकऱ्याची कुर्बानी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीला विशेष धार्मिक महत्त्व असते. परंपरेनुसार या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते आणि त्यानंतर मिळालेल्या मांसाचे 3 भाग केले जातात. त्यातील एक भाग स्वतःसाठी, दुसरा नातेवाईक आणि मित्रांसाठी, तर तिसरा भाग गरिब आणि गरजू लोकांसाठी दिला जातो. धार्मिक परंपरेनुसार हे वाटप पूर्ण झाल्यानंतरच कुर्बानी वैध मानली जाते. यंदाही अनेक ठिकाणी ही परंपरा पाळण्यात आली. राज्यभरातील मुस्लिम समाजाने श्रद्धा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपत बकरी ईद साजरी केली. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर वातावरण तापल्याचं चित्र कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाने ईदच्या दिवशी दुर्गाडी देवी मंदिरात हिंदू भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गुरुवारी सकाळपासूनच किल्ला परिसरात आंदोलन सुरू झाले असून काही कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढल्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत प्रशासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर असून पायथ्याशी ईदगाह आहे. या दोन धार्मिक स्थळांमुळे गेल्या अनेक दशकांपासून येथे वादाची परिस्थिती कायम आहे. मुंबईतील 114 ठिकाणी कुर्बानीचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी परवानगी देणाऱ्या मुंबई महापालिकेला मोठा दिलासा दिला आहे. पालिकेने 29 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला विरोध करत जीव मैत्री ट्रस्टने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे देवनार पशूवधगृहासह पालिकेने मंजूर केलेल्या 114 ठिकाणी कुर्बानीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये 47 पालिका मंडई आणि 67 खासगी मटण दुकानांचा समावेश आहे. ही परवानगी 17 ते 19 जूनदरम्यान लागू राहणार आहे. मात्र, कोणत्याही रहिवासी इमारतीत किंवा सोसायटीमध्ये कत्तलीला परवानगी नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. न्यायमूर्ती एम. के. सोनाक आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने ट्रस्टची मागणी फेटाळली. ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Source link
राज्यात ईदचा उत्साह; मुस्लिम बांधवांकडून शांतता, समृद्धीसाठी प्रार्थना:एकादशीचा आदर राखत पंढरपुरात कुर्बानी टाळली