Headlines

राष्ट्रवादीत कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून संभ्रम, नेते आमच्या संपर्कात- शिरसाट:आमदार फुटीच्या बातम्यामध्ये तथ्य नाही- उमेश पाटील




महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे 22 आमदार फुटणार अशा वावड्या उठू लागल्या आहेत. राष्ट्रवादीत सध्या नेतृत्वावरून संभ्रम असून तिथली परिस्थिती अजिबात आलबेल नाही; त्यांचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असून पक्षात मोठी फूट पडणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी फुटीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुद्द्यावरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये, विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यात अस्वस्थता असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेतल्याने, पक्षाचे 22 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगू लागल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करण्यात आली. बातम्यामध्ये तथ्य नाही- उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, मागील आठवड्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर स्वतः तटकरे यांनी माध्यमांना स्पष्ट माहिती दिली असतानाही, काही माध्यमांनी या भेटीचा चुकीचा अर्थ लावून आमदारांच्या फुटीच्या खोट्या बातम्या रंगवल्याचा आरोप उमेश पाटील यांनी केला. तसेच, सत्तेत असलेले आमदार विरोधी पक्षात जाणार असल्याच्या बातम्या कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय चालवल्या जात आहेत. 22 आमदार भेटल्याचा कोणताही पुरावा आहे का? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या पक्षात काही आलबेल नाही- शिरसाट शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात सर्व काही ठीक नसल्याचे सांगत नव्या चर्चेला वाट करून दिली आहे. शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेमके कोणाच्या नेतृत्वात काम करायचे, असा प्रश्न काही लोकांना पडला आहे. त्या पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढते असून, त्यांचे काही नेते सध्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि संवाद साधत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यांच्या पक्षात नेमके काय शिजतंय हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीत सध्या आलबेल परिस्थिती नसल्याचा दावा केला. राहुल गांधी गोंधळलेल- शिरसाट याच वेळी मंत्री संजय शिरसाट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेलोडी रील’वर आक्षेप घेत, ती रील म्हणजे प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना शिरसाट म्हणाले की, राहुल गांधी यांच्या वक्तव्याला फारसे गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही. राहुल गांधी हे स्वतःच एक गोंधळलेले आणि पूर्णपणे भरकटलेले नेतृत्व आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *