Headlines

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत




राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले. त्या अमरावती येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुनीलभाऊ राणा उपस्थित होते. मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय व हक्कांसाठी गेल्या १२ ते १५ वर्षांपासून लढा देत आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्त प्रामाणिकपणे या संघर्षात सामील झाला असल्याचे सुनीलभाऊ राणा यांनी सांगितले. संघटनेच्या दीर्घ आणि प्रखर संघर्षामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने केले आहे, असे मनोज चव्हाण यांनी आपल्या भाषणात नमूद केले. संघटनेच्या यशामागे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांनी साथ दिली, मात्र कुणीही कामाचे श्रेय लाटले नाही, याचा त्यांना आदर आहे. ४६ अंश सेल्सिअस तापमान असतानाही विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो प्रकल्पग्रस्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. निलेश ठाकरे यांनी संघटनेच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा सादर केला आणि पुढील नियोजनाची माहिती दिली. याप्रसंगी विदर्भातील प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, महाराष्ट्रातील नवीन जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे प्रवक्ते श्रीकृष्ण बैलमारे यांनी केले, तर आभार मयुर विघे यांनी मानले. यावेळी संघटनेचे सचिव गौतमजी खंडारे, सहसचिव अजयभाऊ भोयर, कोषाध्यक्ष संजय गिद, ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ काळे, संघटक राजुभाऊ लोणकर, दिलिपभाऊ कदम, मनोजभाऊ तंबाखे, अरुण पाटील तायडे, अतुल भाऊ मुळे, विवेकजी डेहनकर, अनिलजी मुंढे, लक्ष्मण बोडखे, सचिन ढवळे, रामेश्वर मेटे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आमदार रविभाऊ राणा आणि आमदार बच्चुभाऊ कडू यांच्यासह जिल्ह्यातील इतर राजकीय नेत्यांनी फोनवरून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *