Headlines

रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता!:इंधन तुटवडा अन् कांदा दरावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला




राज्यात एकीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे कष्टाने पिकवलेला कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. पेपरफुटी, महागाई, इंधन टंचाई आणि महिला अत्याचाराने संपूर्ण राज्य होरपळत असताना, सरकार मात्र कमालीचे असंवेदनशील बनले आहे. राज्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता, ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या निरो’ची आठवण येते, अशा अत्यंत तिखट शब्दांत आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार म्हणाले की, डिझेल-पेट्रोलचा वरूनच पुरवठा होत नसल्याने पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, परिणामी ऐन पेरणीच्या तोंडावर मशागतीची कामं खोळंबली आहेत. जळगाव जिल्ह्यात पूर्णतः इंधन साठा संपल्याने पंपांवर रात्रीपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत.
रोहित पवार म्हणाले की, संपूर्ण राज्यभरात अशीच परिस्थिती आहे, परंतु राज्य सरकारला अद्यापही जाग येताना दिसत नाही. पेपरफुटी, इंधन तुटवडा, महागाई, महिला अत्याचार अशी सर्वत्र विचित्र परिस्थिती असून काहीही आलबेल नाही. केंद्र तसेच राज्य सरकारची असंवेदनशीलता बघता ‘रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या निरो’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कांदा उत्पादकाने जगायचं कसं? रोहित पवार म्हणाले की, शेतकरी बाजारात कांदा घेऊन जातो 12 क्विंटल 87 किलो… कांद्याचे 1486 रुपये मिळतात, त्यातून हमाली, तोलाई, गाडी भाडं असे एकूण 1769 रुपये गेले तर उरले किती?… 301 रुपये शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागले. ही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याची वस्तुस्थिती.. आता सरकारनेच सांगावं कांदा उत्पादकाने जगायचं कसं? अशा लाखो कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी या झोपलेल्या सरकारला वठणीवर आणून कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवण्यासाठी परवा मंगळवार, दि. 26 मे 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता चांदवड चौफुली येथे शेतकरी मोर्चात सहभागी व्हा!मी पण येतोय तुम्ही पण या…!
लोकप्रतिनिधीची लवकरच ही चौकशी होईल रोहित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या, कॉ.स्व. गोविंद पानसरे सरांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या, प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लाघ्य शिवीगाळ करणाऱ्या, महिलांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयाने परवानगी दिली असून, लवकरच ही चौकशी होईल, अशी अपेक्षा!
आंबी प्रकरणात पुरावे असतानाही दिरंगाई रोहित पवार म्हणाले की, दुसरीकडं विकास लवांडे यांच्या प्रकरणात न्यायालयात खोटी माहिती देऊन तत्परता दाखवणारं पोलिस प्रशासन प्रशांत आंबी प्रकरणात पुरावे असतानाही दिरंगाई करतंय, यावरुन राजकीय दबाव किती आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. प्रशांत आंबी प्रकरणात उच्च न्यायालयाने देखील याचिका स्वीकारली असून त्या ठिकाणीही लवकरच सुनावणी सुरू होईल. त्यामुळं पोलिसांनी आता तरी चौकशीबाबत दिरंगाई न करता आम्ही जनतेसाठी काम करतो, राजकीय आदेशासाठी नव्हे, हे दाखवून द्यावं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *