![]()
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालिन कठिण परिस्थितीत केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृती घडवून आणली. पत्रकारिता हे राष्ट्रजागृतीचे प्रभावी माध्यम बनवत त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले, असे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी केले. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. वाडेकर म्हणाले की, आज जनजागृतीसाठी अनेक आधुनिक माध्यमे उपलब्ध आहेत. मात्र, त्या काळात कोणतीही आधुनिक साधने नसताना लोकमान्य टिळकांनी स्वतः पुढाकार घेऊन केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जागृतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. इंग्रजांविरुद्ध एकजुटीने लढणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, हा विचार त्यांनी समाजात रुजवला. यावेळी नम्रता मोहोळ आणि प्रतिक्षा मेश्राम यांनीही लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगितले. कार्यक्रमाला शाळेच्या कोषाध्यक्षा विभा वाडेकर, मुख्याध्यापिका हिना बाटविया तसेच शिक्षिका आचल साबळे, क्रांती भारती, प्रतीक्षा यावले, अश्विनी खैरकार, रुपाली इंगोले, श्रुती वाकोडे, सारिका टिंगणे, सारिका डहाके, शिवनेरी निस्ताने, नूतन वाढणकर, प्रतीक्षा ढगे, प्रतीक्षा मेश्राम, कल्याणी राऊत, केतकी गावंडे, संध्या राऊत आणि संगीत शिक्षक अजय राजाराम चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्याची माहिती जाणून घेत त्यांच्या राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.
Source link
लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जनजागृती केली- रघुनाथ वाडेकर