![]()
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. रोही, नीलगाय आणि रानडुकरांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील बहुतांश भागांतील शेतकऱ्यांना रोही, नीलगाय, रानडुकरे आणि इतर वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे पीक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, काही ठिकाणी मानव-प्राणी संघर्षामुळे जीवितहानीही होत आहे. निवेदनानुसार, अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी १२ तालुक्यांमध्ये उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. अमरावती ते चांदूरबाजार, दर्यापूर, परतवाडा, भातकुली, कुऱ्हा आणि मोर्शी या मार्गांवर रोही व इतर वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याने रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शेतकऱ्यांच्या मते, सध्याचा वन कायदा शेतकरीविरोधी असून, यामुळे त्यांची पिके नष्ट होत आहेत आणि जीविताची कोणतीही हमी राहिलेली नाही. शेतकऱ्यांनी या संदर्भात यापूर्वीही प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही, असे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी काही प्रमुख मागण्या केल्या. यामध्ये रोही आणि इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नसबंदीसारख्या उपाययोजना कराव्यात, वन्यप्राण्यांना एकत्रित करून सुरक्षित जंगलात सोडावे, झालेल्या नुकसानीची १०० टक्के भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना सामूहिक कुंपण योजनेसाठी १०० टक्के अनुदान मिळावे, या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी प्रकाश साबळे यांच्यासह सुनील राणा, उमेश ढोणे, आशिष कावरे, देवानंद राठोड, गंगाधर श्रीखंडे, शेखर अवघड, मंगेश इंगोले, तुषार पडोळे, चेतन पाथरे, विश्वंभर मारके, अमित कुचे, रुपेश कळसकर, संजय डहाणे, बाबाराव लेव्हरकर, सचिन लेव्हरकर, संजय लोखंडे, विजु लोखंडे, मंगला लोखंडे, कैलाश सांगळे, प्रशांत खवले, राजेश जावरकर, विक्रम खवले, आदित्यनाथ सोनके, सतिश राव, सुनील ठाकरे, किशोर आमले, श्याम मंगले, दिलीप मेश्राम, धनराज मेहरे, नितीन आमले, प्रदीप ढोले, प्रल्हादराव पाळेकर, अशोक घाटोळ, रामकृष्ण खवले, गोपाल जयस्वाल, जगदीश जनारकर, मनिश हिवे, दिनेश टाकरखेडे, देवानंद सोळंके, दिनेश सिनकर, दिलीप ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.
Source link
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी:विभागीय आयुक्तांना निवेदन, प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन