Headlines

वर्षातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत मेळघाटातील तेंदूपत्ता हंगाम सुरु:वर्षभराची जमापुंजी गोळा करण्यासाठी आदिवासींचे परिश्रम‎




मेळघाटातील जंगल परिसरात पुन्हा एकदा तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली असून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात जंगलातून तेंदूपत्ता तोडण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रोजगाराची कमतरता भासत असताना तेंदूपत्ता हंगाम हा अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. जंगलातून पत्ता गोळा करून त्याचे गठ्ठे तयार करण्यात येत असून प्रती नग ३ रुपये ३० पैसे तसेच ३३० रुपये प्रमाणे मजुरी मिळत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दाम मुक्काम दाभिया, ता. चिखलदरा या गावाला भेट दिली असता गावातील ज्येष्ठ शेतकरी तसेच एकलव्य विद्यालयाचे शिक्षक कुंजीलाल गंगाराम सावरकर व त्यांच्या पत्नी नीला कुंजीलाल सावरकर यांनी तेंदूपत्ता तोडणीच्या पारंपरिक व्यवसायाबाबत सविस्तर माहिती दिली. सावरकर यांनी सांगितले की, मेळघाटातील अनेक आदिवासी कुटुंबांसाठी तेंदूपत्ता हंगाम हा वर्षातील महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. जंगलाशी नाळ जोडलेल्या आदिवासी समाजातील महिला, पुरुष तसेच युवक पहाटेपासून जंगलात जाऊन पत्ता गोळा करतात. या कामामुळे ग्रामीण भागातील शेकडो कुटुंबांना तात्पुरता का होईना रोजगार उपलब्ध होतो. नीला सावरकर यांनी देखील महिलांच्या सहभागाबाबत माहिती देताना सांगितले की, घरातील महिला मोठ्या मेहनतीने पत्ता वेचणे, त्यांचे गठ्ठे बांधणे आणि जमा केंद्रावर पोहोवण्याचे काम करतात. या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणासाठी, घरखर्चासाठी तसेच दैनंदिन गरजा भागविण्यास मदत होते. यामुळे आदिवासींना बऱ्यापैकी आर्थिक आधार मिळतो. तो बघता मेळघाटातील अनेक कुटुंब सध्या तेंदूपत्ता वेचण्याच्या कामाला लागले आहेत. मेळघाटातील डोंगर-दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे जीवन जंगलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तेंदूपत्ता हंगामामुळे अनेकांच्या घरात आर्थिक दिलासा मिळत असून गावागावात सध्या कामाची लगबग पाहायला मिळत आहे. कठीण परिस्थितीतही आदिवासी बांधव निसर्गाशी नाते जपत आपल्या परंपरागत व्यवसायाला जिवंत ठेवत आहेत. तेंदूपत्ता संकलन दर हा मागील काही वर्षांपासून एकसारखाच आहे. महागाई वाढली तरी त्यात कोणताही बदल झाला नाही. यंदा शासनाने तेंदूपत्ता संकलन दरात वाढ करून अधिक आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा आदिवासींनी व्यक्त केली आहे. मेळघाटातील जंगल परिसरात सुरू झालेला हा तेंदूपत्ता हंगाम सध्या आदिवासी समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. कारण, यामुळे त्यांच्या पोटाला सुखाचे दोन घास मिळणार असून यासाठीच ते दिवसभर कष्ट घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *