![]()
कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचे खरे महत्त्व संपूर्ण जगाने अनुभवले. त्या काळात कृत्रिम ऑक्सिजनसाठी मोठा खर्च करावा लागत होता तर ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, वृक्ष आपल्याला चोवीस तास मोफत नैसर्गिक ऑक्सिजन देतात. कोरोनानंतर वृक्षांचे महत्त्व सर्वांना पटले असले, तरी समाजात अजूनही वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी केले. नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत तसेच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून केडगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध मान्यवरांसह रामानंद संप्रदायाचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचा संकल्प यावेळी करण्यात आला. जाधव म्हणाले, ग्रीन सिटी मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण शहर हरित करण्याचा संकल्प करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जात आहे. मात्र केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नगरकरांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरात वृक्ष लावून त्यांचे जतन करावे. यावेळी नगरसेवक विजय पठारे, दत्ता गाडळकर, सुजय मोहिते, रघुनाथ शेळके, संजय गाडेकर, प्रा. हर्षल आगळे, कैलास दिघे उपस्थित होते.
Source link
वृक्षारोपण अन् संवर्धनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज:केडगावात वृक्षारोपण मोहिमेला मिळाला प्रतिसाद