दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधूर आणि कथित अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर
.
पत्रकार परिषदेत बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, “ज्या जनतेमुळे तुम्ही सत्तेत बसला आहात, त्याच जनतेतून आलेले हे विद्यार्थी आहेत. ज्यांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलं, तेच तुम्हाला खालीही उतरवू शकतात. सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला आहे.”
विद्यार्थी दहशतवादी नाहीत
दिल्लीतील आंदोलनकर्त्यांना काही नेत्यांनी ‘दहशतवादी’ म्हटल्याबद्दल अमित ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही मुलं दहशतवादी नाहीत. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवणार असाल, तर त्याचे पुरावे द्या.”
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी, “ज्यांनी आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हटलं, त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. एवढं गंभीर लेबल लावत असाल, तर त्यामागे ठोस पुरावे असलेच पाहिजेत,” असे आव्हान दिले.
लोकशाही धोक्यात असल्याची भावना
दिल्लीतील आंदोलनाचा अनुभव सांगताना अमित ठाकरे म्हणाले की, उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलविण्यात आले. हे दृश्य पाहून लोकशाही धोक्यात असल्याची भावना निर्माण झाली.
ते म्हणाले, “20 दिवस उपोषण करणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली नाही. संवाद झाला असता तर प्रश्न तेव्हाच सुटला असता. पण सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग निवडला.”
लाठीचार्ज, अश्रुधूर आणि महिलांवरील अत्याचाराचे आरोप
दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूराचा वापर आणि महिलांवरही कारवाई केल्याचा आरोप करत अमित ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
“विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे लाठीमार केला जात आहे. मुलींवरही पोलिसांकडून अत्याचार झाल्याचे आरोप समोर आले आहेत. पोलिसांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आंदोलन करणारे विद्यार्थी दहशतवादी नाहीत,” असे ते म्हणाले.
देशभर आंदोलन पेटेल
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत अमित ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला.
“20 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर हा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने जबाबदारी स्वीकारून कारवाई केली नाही, तर हे आंदोलन देशभर पेटेल. लोक आता शांत बसणार नाहीत,” असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाला ‘फेसलेस’ म्हटल्याच्या वक्तव्यावर अमित ठाकरे यांनी पलटवार केला.
“ज्या ‘फेसलेस’ लोकांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, त्याच लोकांच्या ताकदीवर तुम्ही सत्तेत आहात. त्यांना कमी लेखण्याची चूक करू नका,” असे ते म्हणाले.
खरे दहशतवादी सरकारच
सरकारच्या भूमिकेवर टीका करताना अमित ठाकरे यांनी, “सरकारच दडपशाही करत असेल, आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरवत असेल, तर खरे दहशतवादी कोण आहेत, याचा विचार देशाने करायला हवा,” असे म्हणत सरकारवर तीव्र टीका केली.
त्याचबरोबर त्यांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना घाबरू नका, मनसे तुमच्या पाठीशी उभी आहे, असा संदेशही दिला. तसेच पोलिसांनीही आंदोलनकर्त्यांशी संवेदनशीलतेने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा..
मला गोळी घाला, पण आवाज दाबू शकत नाही!:दिल्लीतील लाठीहल्ल्यातील नागपूरचा भरत बानाईत चर्चेत, आई-वडिलांचा सरकारला सवाल

‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतरमंतर येथे पुकारलेल्या ‘संसद मार्च’ आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये नागपूरचा 27 वर्षीय पदवीधर तरुण भरत बनाईत हा पोलिसांच्या मारहाणीचा सामना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेवर भारतच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी