![]()
राज्यातील शिक्षक भरती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि पदोन्नती प्रक्रियेबाबत विधानसभेत महत्त्वाची माहिती देण्यात आली. भाजप आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर करण्याच्या सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) दिल्या जातील, मात्र त्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, परभणी, बीड, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शिक्षकांची पदे आहेत. महाराष्ट्रात एकूण 1,882 अतिरिक्त पदे असून त्यापैकी परभणीमध्ये 337, बीडमध्ये 364, धाराशिवमध्ये 289 आणि जालन्यात 112 अतिरिक्त शिक्षकांची पदे आहेत. या शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, शिक्षक ते मुख्याध्यापक, मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख, तसेच पुढील पदांवरील पदोन्नतीनंतरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करता येते. मात्र यावर्षी संचमान्यता प्रक्रिया नेहमीप्रमाणे सप्टेंबरमध्ये न होता फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाली. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला विलंब झाला. TET अनिवार्य झाल्याने प्रक्रियेला विलंब सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदोन्नतीसाठी आता शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय या संदर्भातील अनेक प्रकरणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने पदोन्नती आणि समायोजन प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचे गोरे यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करता येईल. सध्या जिल्हा परिषद स्तरावर प्रथम सहाय्यक शिक्षकांना पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक पदांवर पदोन्नती दिली जाईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. सीईओंना सूचना देणार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचे अधिकार ग्रामविकास विभागाच्या 18 मे 2011 च्या शासन निर्णयानुसार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्व संबंधित सीईओंना तातडीने सूचना दिल्या जातील आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले जातील, असे मंत्री गोरे यांनी सांगितले. बदली प्रक्रियेतही होणार सुधारणा यावेळी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवरही मंत्री गोरे यांनी भाष्य केले. सध्या बदली प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाली असून अनेक शासन निर्णय (जीआर) आणि विविध टप्प्यांमुळे ती ऑक्टोबरपर्यंत लांबते. त्यामुळे शासन या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करणार असून शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांच्या पदोन्नती, बदली आणि समायोजनाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होतील, अशा स्वरूपाची नवीन नियमावली तयार करण्याचा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. संबंधित बातमी वाचा.. LIVE पावसाळी अधिवेशन:भेसळखोरांवर सरकारचा मोठा इशारा, मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असल्याची विधानसभेत माहिती गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी आतापर्यंत उपस्थित केलेले विविध प्रश्न, आरोप आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात सविस्तर उत्तर देणार आहेत. आज अधिवेशनाची सांगता होत असल्याने सरकार नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
शिक्षक भरती आणि समायोजनाबाबत सरकारची मोठी माहिती:मंत्री जयकुमार गोरे म्हणाले- पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नाही!