Headlines

श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई – धीरेंद्र शास्त्री भेटीवरील टीका फेटाळली




अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव हल्ली प्रसिद्धीसाठीच काहीतरी बोलतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेली टीका धुडकावून लावली आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी या प्रकरणी त्यांच्यावर तिखट हल्ला चढवत त्यांना यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेण्याचा सल्ला दिला होता. पत्रकारांनी याविषयी धुळे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी श्याम मानव सध्या प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात असे सांगत त्यांचा समाचार घेतला. श्याम मानव थोडीच सर्टिफिकेट वाटणारे आहेत भूषण गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ नये असे सांगणारे श्याम मानव कोण आहेत? ते थोडीच सर्टिफिकेट वाटणारे आहेत? श्याम मानव अलिकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे प्रसिद्धी मिळावी म्हणून ते रोज अशी विधाने करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. काय म्हणाले होते श्याम मानव? अंनिसची बुवाबाजीविरोधात प्रबोधन सभा शनिवारी अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडली. तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्याम मानव यांनी भूषण गवई यांच्यावर निशाणा साधला. माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्री यांच्या पाया पडण्यास गेले. ते पाहून मला प्रचंड धक्का बसला. भूषण गवई म्हणतात की, मी आंबेडकरी विचारांचा आहे. आंबेडकरी विचारांचे मी दूध प्यायलो आहे. पण ते जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील, तर आता तुम्ही यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचे नाही. तो अधिकार तुम्ही गमावला आहे, असे ते म्हणाले. धीरेंद्र शास्त्रींचे शिवरायांवरही वादग्रस्त विधाने धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवरही वादग्रस्त विधान केले. ते शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना म्हणाले होते, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे. आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले. त्यांच्या या विधानावर आता प्रचंड राजकीय वाद होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *