![]()
सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांच्याकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे काही पुरावे आहेत का? संजय राऊत नेहमीच अशी मोठमोठी विधाने करतात. पण त्यांचे काहीही खरे होत नाही. त्यांनी आपल्या सवयीनुसार मोठ्या रकमेचे आकडे सांगितले. त्यांना रोज सकाळी भडक वक्तव्य करण्याची सवय आहे, असे ते म्हणालेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 150 कोटींचा घोडेबाजार झाल्याचा आरोप केला. विरोधी पक्षातील काही उमेदवारांनी स्वतःचा भाव ठरवून व्यवहार केल्याचे नमूद करत त्यांनी कोकण, छत्रपती संभाजीनगर व पुण्यातील घडामोडी लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी वरील शब्दांत संजय राऊत यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. शंभूराज देसाई म्हणाले, घोडेबाजार झाल्याचे कुणाकडे काही पुरावेत आहेत का? असे आरोप करणाऱ्यांना पुरावे देण्यास सांगा. उगीच हवेत गप्पा मारण्यात अर्थ नाही. महायुतीकडे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीची मते आहेत. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवरही आमच्या आघाड्या आहेत. त्यामुळे या सर्व मतांची बेरीज पाहिली तर महाविकास आघाडीचा आमच्यापुढे टिकावच लागणार नाही. संजय राऊत नेहमीच अतितटीचा सामना होईल, महायुतीला जागा दाखवू अशा बढाया मारतात. पण त्यातील काहीही खरे होत नाही. त्यानुसार, त्यांनी मोठ्या रकमेचे आकडे सांगितले. त्यांना रोज सकाळी भडक वक्तव्य करण्याची सवय आहे. त्यात काहीही तथ्य नाही. ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदेंच्या संपर्कात शंभूराज देसाई यांनी यावेळी कोकणातील महायुतीचे उमेदवार बाळ माने यांच्या अर्ज मागे घेण्याच्या मुद्यावरही भाष्य केले. तसेच ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, बाळ माने यांनी ठाकरे गटाकडून अर्ज भरला होता. काल अर्ज मागे घेईपर्यंत संजय राऊत सातत्याने बाळ माने आमचे उमेदवार असल्याचा दावा करत होते. कोकणात महायुतीला त्यांची जागा दाखवण्याची वल्गना करत होते. पण बाळ माने यांना आपल्याकडे मतांची बेरीज नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे ते वाईट झाले. संजय राऊत यांनी लगेचच त्यांच्यावर टीका सुरू केली. त्यानंतर बाळ माने यांनी विनायक राऊत यांच्यावर शिंदे गटाकडून रिचार्ज घेतल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे यांना आतून मानणारे असे अनेक लोक ठाकरे गटात आहेत. आपल्या काही तांत्रिक अडचणींमुळे ते तिकडे राहिलेत. पण अनेक लोकं आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. बाळ माने बोलले म्हणून बरे झाले. त्यातून त्यांच्यातील आतल्या गोष्टी बाहेर आल्या. आम्ही कुणी बोललो नाही. भाजपकडूनही कुणी बोलले नाही. या प्रकरणी त्यांच्याच गोष्टी बाहेर आल्या. त्यामुळे बाळ माने यांच्यामुळे ठाकरे गटात काय सुरू आहे याची माहिती महाराष्ट्राला कळली, असे ते म्हणाले. नाशिकच्या तिढ्यावर तोडगा काढणे सुरू नाशिकमधील महायुतीमधील घडामोडींचा परिणाम राज्यात इतरत्र होईल का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी त्यांना केला. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, नाशिक येथील एक उमेदवार राहिला आहे. दोन गिते बंधूंपैकी एका बंधूने अर्ज मागे घेतला आहे, तर दुसऱ्या गितेचा अर्ज तसाच राहिला आहे. शिवसेनेतर्फे आमचे ज्येष्ठ नेते मंत्री उदय सामंत तिथे आहेत. मंत्री गिरीश महाजन तिथे आहेत. त्यांची चर्चा व बैठका सुरू आहेत. कदाचित त्यातून काही तोडगा निघू शकेल, असे ते म्हणाले.
Source link
संजय राऊतांकडे घोडेबाजाराचे पुरावे आहेत का?:शंभूराज देसाईंचा सवाल; ठाकरे गटात शिंदेंना मानणारे अनेक नेते असल्याचा दावा