![]()
शहरातील गंज बाजार आणि परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित झाला आहे. येथील व्यावसायिक दुकाने, नागरी वसाहती आणि परिणामी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र, याच मुख्य बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गंज बाजार पोलीस चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूपबंद आहे. ही चौकी बंद असल्याने संपूर्ण परिसरात सध्या असुरक्षिततेचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गजबजलेल्या भागात पोलीस चौकी केवळ एक शोभेची वास्तू बनून राहिली आहे. पोलीस प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाला दररोज विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भरबाजारपेठेत २४ तास पोलिसांचे अस्तित्व नसल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढले आहे. परिसरात चोऱ्या, पाकीटमारी आणि किरकोळ कारणांवरून होणारे वाद नित्याचे झाले आहेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाताना असुरक्षित वाटते. तसेच संध्याकाळच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी आणि टवाळखोरांचा सुळसुळाट यामुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. बाजारपेठेत कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना थेट मुख्य पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा लागतो. तिथून पोलिस पोहोचेपर्यंत मोठा वेळ निघून जातो. जर ही स्थानिक पोलीस चौकी कार्यरत असती, तर गुन्हेगारांवर वचक राहिला असता आणि अनुचित प्रकारांना वेळीच आळा बसला असता. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होऊन सामान्य जनतेच्या आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा, अशी तीव्र भावना या भागातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. चौकी बंद राहण्याचे हे आहे कारण कर्मचाऱ्यांची कमतरता आणि अंतर्गत नियोजनाचा अभाव यामुळे ही चौकी बंद आहे. मुख्य पोलीस ठाण्यावर कामाचा ताण असल्याने गंज बाजारसारख्या स्थानिक चौक्यांवर कायमस्वरूपी अंमलदार नेमण्याकडे दुर्लक्ष होते, ज्यामुळे चौकीला कुलूप लावल्याचे दिसते.
Source link
गंज बाजार पोलिस चौकी बंद असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांत असुरक्षिता:चौकी ठराविक कालावधीत तरी सुरु ठेवण्याची मागणी