![]()
राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून सूर्याच्या प्रखर किरणांनी नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असताना विदर्भावर मात्र सूर्याची विशेष वक्रदृष्टी पाहायला मिळत आहे. अकोला शहरात सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, जागतिक नकाशावरही अकोल्याने मंगळवारी उष्णतेचा उच्चांक गाठला. ‘एल्डोराडो’ या जागतिक हवामान संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी अकोला आणि कर्नाटकातील कलबुर्गी या दोन शहरांनी जगातील सर्वात उष्ण शहरांचा मान पटकावला. या दोन्ही शहरांत 44 अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगात अकोल्याची उष्णता चर्चेचा विषय ठरली आहे. उन्हात बाहेर जाणे टाळावे अकोला शहराचे तापमान मंगळवारी 44 अंश नोंदवले गेले. शहराचे हे या वर्षातील सर्वाधिक तापमान आहे. पाच दिवसांत अकोल्याचे तापमान तब्बल 5.3 अंशांनी वाढले आहे. भारतीय हवामान विभागाने अमरावती व अकोल्यात 16 ते 19 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. बुलडाण्यात 17 ते 18 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट राहणार आहे. तर वर्धा येथे 18 एप्रिलला उष्णतेची लाट येणार आहे. यवतमाळमध्ये 17 ते 18 एप्रिदरम्यान उष्णतेची लाट राहणार आहे. दरम्यान, गत पाच दिवसांत अकोल्याचे तापमान 38.7 अंशांवरून वाढून 44 अंशांवर पोहोचले आहे. अकोला शहराचे तापमान हे 20 एप्रिलपर्यंत निरभ्र, कोरडे, अति उष्ण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हात शक्यतो वाहने चालवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विदर्भात निरभ्र आकाश, उत्तरेकडील उष्ण वारे आणि हवेच्या उच्च दाबामुळे दररोज तापमान वाढत असल्याचे हवामान तज्ञांनी संगितले. चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेटबंद असलेल्या वाहनात, पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. पशुधन, पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे. त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आभाळ निरभ्र, सूर्यकिरणे थेट जमिनीवर कर्नाटक व लगतच्या महाराष्ट्रात उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे हवा खाली दाबली जात असल्याने ती गरम होत आहे. यामुळे जमिनी लगतची उष्णता वातावरणात वर जाऊ शकत नसल्याने तापमान वाढत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स कमकुवत झाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव ओसरला असून आभाळ निरभ्र झाले आहे. त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडून तापमान वाढत आहे, असे हवामान तज्ञांनी सांगितले. बाष्पयुक्त वाऱ्यांअभावी तापमानात वाढ प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. अकोल्याचे तापमान 48 तासांत 45 अंशांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण घटले असून कोरड्या हवामानामुळे तापमानात वाढ होत आहे.अमरावती, वाशीम, यवतमाळ,वर्धा, बुलडाण्यात जिल्ह्यात 20 तारखेपर्यंत तापमानाचा पारा सततवाढत जाण्याची शक्यता आहे.
Source link
सूर्याचा प्रकोप!:अकोला अन् कलबुर्गी ठरली जगातील सर्वाधिक उष्ण शहरे, पारा 44 अंशांवर