Headlines

हिंगोलीतील शुभम राजे खून प्रकरणी तिघांना जन्मठेप:न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; मुलीची छेड काढल्याच्या वादातून झाली होती हत्या




हिंगोली शहरातील एका तरुणाच्या खून प्रकरणात तिघांना जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस.एन. माने-गाडेकर यांनी सोमवारी ता ६ दिला आहे. याबाबत जिल्हा सरकारी वकील ॲड एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील तलाब कट्टा भागांमध्ये ता. 18 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:30 ते 9:45 शुभम राजे याच्या तिन जणांसोबत एका मुलीची छेड काढण्यावरून वाद झाला होता. यावरून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी शुभमवर लोखंडी रॉड आणि खंजीरने हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ता. 19 एप्रील 2022 रोजी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माने गाडेकर यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बबलू उर्फ बाबा सुभाष धाबे (23 वर्षे), संतोष उर्फ मोहन चिंतामणराव जोरेवार (20 वर्षे) आणि विशु उर्फ विश्वास संजय मेकवाल (21 वर्षे सर्व रा हिंगोली) या तिघांनाही दोषी ठरवले आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 302 नुसार या तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दंड म्हणून वसूल केलेल्या एकूण रकमेपैकी एक लाख रुपये मृताची आई शोभाबाई राजे यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या घटनेतील जखमी साक्षीदार अजय चोपडे यांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले आहेत या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक सरकारी वकील ॲड एस.डी. कुटे, ॲड सविता देशमुख यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार एम.बी. गव्हाणे यांनी काम पाहिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *