![]()
पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आता वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही यातील मृतांच्या अनेकांना न्याय मिळाला नाही. त्यात भाजप सध्या महिला आरक्षण विधेयकासाठी आंदोलन करत असतानाच पहलगामच्या महिलांना न्याय कधी देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, सध्या देशात अफवांचे पेव फोडून आणि खोट्या आंदोलनांचा बाजार मांडत फिरणाऱ्या भाजप सरकारला तब्बल 11 महिन्यांनंतर जाग आली. पुण्याच्या असावरी जगदाळे या एका भगिनीला नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन ‘कर्तव्य’ पार पाडल्याचा आव आणला गेला. पण हा प्रश्न एका नोकरीपुरता मर्यादित आहे का? न्यायाची प्रतीक्षा की केवळ आश्वासनांची खैर? पहलगाममध्ये ज्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले, ज्यांचे संसार उध्वस्त झाले, त्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसायला सरकारला वर्ष का लागते? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. पुढे अंबादास दानवे म्हणाले, आंदोलनांचा इव्हेंट कशासाठी? रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची हौस असणाऱ्या राज्यकर्त्यांनी एकदा पहलगामच्या पीडितांच्या डोळ्यात डोळे घालून सांगावे, न्याय कधी मिळणार? तसेच आमचा रोकडा सवाल, भाजपने आपल्या आंदोलनाच्या गदारोळात हे स्पष्ट करावे की, हिंदूंना ‘वेचून’ मारणाऱ्या त्या मारेकऱ्यांचे मुडदे कधी पडणार? राजकारणासाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा, ज्यांनी कुंकू पुसण्याचे कुकर्म केले त्यांना यमसदनी कधी धाडणार? असा रोखठोक सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. वर्षापूर्तीनंतर कडेकोट बंदोबस्त पहलगाम येथील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात लष्कर आणि सुरक्षा दलांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अलीकडील संभाव्य धोके लक्षात घेता, या भागात श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथके दाखल झाली असून प्रत्येक ठिकाणची सखोल तपासणी केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कसर न सोडता, सुरक्षा यंत्रणांकडून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची ओळखपत्रे अतिशय काटेकोरपणे तपासली जात आहेत. सुरक्षा दलांनी विशेषतः महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण परिसर ‘सॅनिटाईज’ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी अतिरिक्त नाकेबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, खबरदारीचा उपाय म्हणून पहलगाममधील काही प्रमुख पर्यटन स्थळे पर्यकांसाठी सध्या तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत.
Source link
हिंदूंना 'वेचून' मारणाऱ्यांचे मुडदे कधी पडणार?:अंबादास दानवेंचा सरकारला रोकड सवाल; पहलगाम भ्याड हल्ल्याला एक वर्ष पूर्ण