![]()
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसमोर नव्याने तयारी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळाचा आणि अनिश्चिततेचा सर्वाधिक मानसिक तसेच शैक्षणिक फटका लातूरमधील ‘आरसीसी’ कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली सीबीआयची कारवाई आणि आरसीसीचे शिवराज मोटेगावकर यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे या संस्थेच्या भवितव्याबाबतच आता साशंकता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे घेतलेली कठोर मेहनत आणि लाखो रुपयांची फी भरून घेतलेला प्रवेश आता संकटात सापडल्याची भावना निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे उर्वरित दीड महिन्यांच्या तयारीसाठी आता कुठे जावे, कोणत्या शिक्षकांवर विश्वास ठेवावा आणि अभ्यासाची पुढची दिशा कशी असावी, या चिंतेने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम आणि निराशेचे वातावरण आहे. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या गोंधळाच्या स्थितीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लातूरसह राज्यातील अनेक खासगी कोचिंग क्लासेसनी आता मदतीचा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत पुढील दीड महिन्यांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी न आकारण्याचा स्तुत्य निर्णय काही संस्थांनी घेतला असून, त्यांच्यासाठी मोफत टेस्ट सिरीज, डाऊट सोल्व्हिंग सेशन्स आणि विशेष क्रॅश कोर्स सुरू करण्याची जय्यत तयारीही या क्लास चालकांकडून करण्यात आली आहे. आरसीसी पुन्हा सुरू होणार का? आरसीसी कोचिंग क्लास पुन्हा सुरू होणार की नाही, संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध राहतील का आणि व्यवस्थापनावर प्रशासनाकडून भविष्यात आणखी कोणती कारवाई होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता न आल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. निर्माण झालेल्या या संभ्रमाच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे बहुतांश विद्यार्थी आणि पालक सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत नक्की काय निर्णय समोर येतो, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पालकांवर ओढवले मोठे आर्थिक संकट या संपूर्ण शैक्षणिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांसमोरही एक मोठे आर्थिक आणि मानसिक संकट उभे राहिले आहे. एका बाजूला आधीच कोचिंग क्लाससाठी झालेला मोठा खर्च आणि आता ऐनवेळी पुन्हा नव्याने क्लास लावण्याची आलेली वेळ, यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. हा अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड परवडणारा नसल्याने, आता नाईलाजास्तव अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना घरबसल्या ऑनलाइन तयारीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लातूर हे एक प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, सद्यस्थितीत ‘आरसीसी’सारख्या मोठ्या आणि ख्यातनाम संस्थेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या व अनिश्चिततेच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमालीचा डळमळीत झाला आहे.
Source link
NEET पेपरफुटीचा लातूर पॅटर्नला मोठा फटका!:RCC च्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, पालकांवरही ओढवले आर्थिक संकट