![]()
अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आज, सोमवार, २५ मे रोजी मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोझरी येथील थोर समाजसेवक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या बहुमानामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तिवसा जवळील मोझरी गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात जनार्धन बोथे यांचा जन्म झाला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेवर कुटुंबाची नितांत श्रद्धा होती. बोथे गुरुजी राष्ट्रसंतांचे केवळ अनुयायीच बनले नाहीत, तर सावलीसारखे सोबत राहून त्यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. राष्ट्रसंतांच्या महासमाधीनंतर बोथे गुरुजींनी “ग्रामगीता’ हाच आपल्या जगण्याचा मुख्य मार्ग बनवला. ग्रामगीतेतील विचारांतून प्रेरणा घेऊन त्यांनी आयुष्यभर अविरत कार्य केले. गावागावांत जाऊन स्वच्छता आणि व्यसनमुक्तीची मोठी चळवळ उभारली. सोबतच तब्बल ८०० हून अधिक महिला बचत गटांना सक्षम बनवून, त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. वृक्षारोपण आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश आपल्या कृतीतून दिला. ग्रामीण व दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी बोथे गुरुजींनी १९७२ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत दुर्गम व आदिवासी भागांमध्ये ११ निवासी विद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली आहे. आज या विद्यालयांच्या माध्यमातून हजारो अभावग्रस्त आणि गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. बोथे गुरुजींना “पद्मश्री’ पुरस्कार मिळताच संपूर्ण अमरावती जिल्हा, विशेषतः तिवसा आणि मोझरी परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे. “हा पुरस्कार म्हणजे एका व्रतस्थ सामाजिक व्रतीचा आणि राष्ट्रसंतांच्या मानवतावादी विचारांचा गौरव आहे,” अशा शब्दांत सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विविध कार्यात बोथे गुरुजींची कामगिरी प्रेरणादायी बोथे गुरुजींचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांनी राष्ट्रसंतांच्या नेतृत्वात झालेल्या ऐतिहासिक ‘किसान रेल्वे यात्रा’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. इतकेच नव्हे तर, १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान सीमेवर तैनात भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रसंतांनी पाठवलेल्या भक्त दलामध्ये सुद्धा बोथे गुरुजींचा समावेश होता. त्यांनी सीमेवर जाऊन सैनिकांना धीर देण्याचे आणि देशाप्रती ऊर्जा निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
Source link
राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; मोझरीचे जनार्धन बोथेंना ‘पद्मश्री’, ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान