![]()
हिंगोली जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मृद व जल संधारण विभागाच्यामार्फत हाती घेण्यात आले असून ता. 21 जून पर्यंत तब्बल 5 लाख घनमीटर गाळ काढण्याचे प्रयत्न आहेत. यातून तब्बल 50 कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेती सिंचनासोबत भुगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीचे पात्र उथळ व अरुंद असल्यामुळे नदीमध्ये पावसाचे पाणी पडल्यानंतर वाहून जाते. त्यामुळे पावसाळ्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यापासूनच नदीचे पाणी कमी होण्यास सुरूवात होते. तर जानेवारी महिन्यात नदी कोरडीठाक पडते. त्यामुळे ही नदीच आहे काय? असा प्रश्न उभा राहतो. नदीचे पाणी आटल्यामुळे त्याचा परिणाम भुगर्भातील पाणी पातळीवर होत असून नदी असूनही परिसरातील भुगर्भातील पाणी पातळी खोल जात असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी विंधन विहीरीचा उपायोग होत नाही. दरम्यान, कयाधू नदीवर बंधारे घेण्याची मागणी सातत्याने होऊ लागली आहे. त्यानुसार शासकीय पातळीवर हालचाली देखील सुरु आहेत. तर दुसरीकडे हिंगोली शहरालगत तीन किलो मीटर अंतरापर्यंत नदीचे पात्र रुंद व खोल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आहे. त्यानुसार त्यांनी मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता व्ही. एन. निर्वळ यांच्यासह नदी पात्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवाय योजनेतून नदीतील गाळ काढणे व खोलीकरण करण्याचे काम करण्याचे ठरविण्यात आले. या कामाला सध्या गतीने सुरुवात झाली असून सहा जेसीबी द्वारे गाळ काढला जात आहे. तसेच नदीपात्राचे 1 ते दोन मीटर पर्यंत खोलीकरण केले जाणार आहे. दरम्यान, पाऊस सुरु होईपर्यंत हे काम सुरु राहणार असून ता. 21 जून पर्यंत तब्बल 5 लाख घनमीटर गाळ काढण्याचे उदिष्ट आहे. त्यानुसार युध्दपातळीवर काम सुरु झाले आहे. गाळ काढणे व खोलीकरणामुळे नदीमध्ये पावसाळ्यात पाणीसाठा वाढणार असून हा पाणीसाठा साधारणतः जानेवारीपर्यंत कायम राहिल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. या नदीत पाणीसाठा झाल्यामुळे परिसरातील शेती सिंचनाखाली येणार आहे. या शिवाय भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार असून त्यामुळे नदीकाठावरील विंधन विहीरींना उन्हाळ्यात देखील पाणी राहण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना गाळ घेऊन जा मृद व जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता व्ही. एन. निर्मळ म्हणाले की, कयाधू नदीचे सुमारे तीन किलो मिटरचे पात्र रुंद करून खोलीकरण केले जाणार आहे. दोन टप्यात हे काम सुरु आहे. नदीतून वाळू उपसा केला जाणार नसून केवळ गाळ उपसा केला जात आहे. शेतकऱ्यांनी गाळ नेऊन शेतात टाकल्यास जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे.
Source link
कयाधू नदी घेणार मोकळा श्वास!:5 लाख घनमीटर गाळ काढण्यास सुरुवात; 50 कोटी लीटर पाणी साठणार