![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीची एक नवी यादी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दप्तरी पाठवणार आहेत. या यादीत जुन्या कार्यकारिणीतील 3 नवख्या नेत्यांचा पत्ता साफ करून त्यांच्या जागी त्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या यादीत सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल या नेत्यांची वर्णी लागणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार यांनी गत महिन्यात निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणीची एक यादी पाठवली होती. त्यात प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे या दोघांचीही नावे नव्हती. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी या दोन्ही बड्या नेत्यांना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळे पटेल व तटकरे नाराज झाले होते. त्यानंतर पक्षाने सारवासारव करत ही एक तांत्रिक चूक असल्याचे नमूद करत ती लवकरच दुरुस्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. ही चूक केव्हा दुरुस्त होणार? याची उत्सुकता लागली असताना आता राष्ट्रवादीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणीची नवी सुधारित यादी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित कार्यकारिणीतून तिघे आऊट, तिघे इन मिळालेल्या माहितीनुसार, नव्या कार्यकारिणीत सना मलिक, सुबोध मोहिते व प्रजापती या 3 सदस्यांची नावे वगळण्यात येतील. सना मलिक या पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कन्या आहेत. त्यांच्या जागी मंत्री हसन मुश्रीफ यांना स्थान दिले जाईल. तर सुबोध मोहिते व प्रजापती यांच्या जागी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. पण त्याची अद्याप पुष्टी झाली नाही. ही यादी केव्हा पाठवली जाणार हे ही अजून स्पष्ट नाही. पण उपरोक्त तिघांना सुधारित यादीत स्थान असणार नाही हे मात्र जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी पक्षनेतृत्वाला म्हणजे सुनेत्रा पवारांना खडेबोल सुनावल्याच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ व त्यांच्यात चांगलीच जुंपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय असेल? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमका काय घडला होता प्रसंग? राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंनी विलिनीकरणाच्या मुद्यावर आपल्यासह प्रफुल्ल पटेलांना तोफेच्या तोंडी देण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे, पक्ष एकसंध ठेवणे यासाठी मी व प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत आमच्या दोघांवर टीका झाली. त्यावेळी पक्षाचा एकही आमदार किंवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरही आम्ही दोघेच तोफेच्या तोंडी गेलो. त्यावेळीही पक्षातील कुणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. मग प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांनीच टीकेचे धनी व्हायचे का? वरिष्ठ नेतृत्व याविषयी काही भूमिका घेणार आहे की नाही? असा सवाल तटकरेंनी यावेळी उपस्थित केला. सुनील तटकरे यांनी या माध्यमातून पक्षनेतृत्वाला अर्थात थेट सुनेत्रा पवार यांनाच जाब विचारल्याने ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी तटकरेंना रोखण्याचा प्रयत्न केला. जे झाले ते झाले, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पण तटकरेंनी भुजबळांच्या प्रयत्नांना न जुमानता आपले बोलणे सुरूच ठेवले. मी यावर बोलणार आणि याविषयी आता स्पष्टता यायला हवी, असे ते ठणकावत म्हणाले. यावरून भुजबळ व त्यांच्यात काहीशी शाब्दिक चकमक झाली.
Source link