Headlines

वाकीतील महिला बचत गट 'फार्मर कप 2026' साठी सज्ज:सेंद्रिय शेती आणि गावाच्या विकासासाठी पुढाकार




भातकुली तालुक्यातील वाकी येथील महिलांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेती विकास, सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि गावाला राज्यस्तरावर ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. कृषी यंत्रणेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वाकी गावातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. गावात नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. यावेळी महिलांनी शेती विकासाची जबाबदारी हाती घेत, गावाला राज्यात एक महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला कृषी विभागाच्या मेंटॉर रूपाली ठाकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशन अभियानाचे प्रशांत ठेवले, सहाय्यक कृषी अधिकारी कविता तायडे तसेच गावातील नारीशक्ती बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रूपाली ठाकरे यांनी ‘फार्मर कप २०२६’ स्पर्धेचे नियम, गुणांकन पद्धती आणि गटबांधणीचे महत्त्व यावर सविस्तर माहिती दिली. महिलांनी एकत्रित आणि नियोजनबद्ध काम केल्यास वाकी गाव राज्यस्तरीय स्पर्धेत निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहाय्यक कृषी अधिकारी कविता तायडे यांनी महिलांना ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नद्रव्य प्रक्रिया उद्योग’ (पीएमएफएमई) योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत ३५ टक्के अनुदान आणि ९० टक्क्यांपर्यंत बँक कर्ज उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. चांगला सिबिल स्कोअर असलेल्या महिला व बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशांत ठेवले यांनी महिलांना शाश्वत आणि कमी खर्चिक शेती पद्धतींबद्दल मार्गदर्शन केले. ‘इर्जीक पद्धत’, दशपर्णी अर्क, जीवामृत आणि एसओपीच्या वापरामुळे शेतीचा खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महिलांकडून प्रत्यक्ष दशपर्णी अर्क तयार करून घेण्यात आला, ज्यामुळे रासायनिक फवारण्यांवरील खर्च कमी करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. या स्पर्धेसाठी तालुक्यात एकूण ७३ गटांची गटबांधणी झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जास्तीत जास्त गटांनी दशपर्णी अर्क तयार करून सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे आवाहनही करण्यात आले. ‘फार्मर कप’च्या माध्यमातून शेतकरी एसओपीचा वापर करून शाश्वत शेतीकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *