![]()
ज्या दिवशी दूरदर्शनवर रघुभाऊंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा झाली, तो क्षण संपूर्ण संगमनेरकरांच्या छाती अभिमानाने फुगवणारा होता. संगमनेरला मिळालेला हा पहिला पद्मश्री मान आहे. आज जेव्हा प्रत्यक्ष पद्मश्री पदक संगमनेरच्या भूमीत येताना पाहिले, तेव्हा खरोखर अंगावर काटा उभा राहिला,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्ण आणि अभिमानाचा क्षण आज संगमनेरकरांनी डोळ्यात साठवला. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार पटकावल्यानंतर लोककलेचे राजे रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी खेडकर यांचा सत्कार करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या सोहळ्याला नगराध्यक्षा मैथिली तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. आमदार तांबे यांनी खेडकर परिवाराने जपलेल्या माणुसकीच्या आणि ऋणानुबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. कराड दौऱ्यादरम्यान माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी झालेल्या भेटीचा संदर्भ देत ते म्हणाले, रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री तथा ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई यांनी एका अडचणीच्या काळात मदतीसाठी श्रीनिवास पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी पाटील यांनी केलेली मदत कांताबाईंनी आयुष्यभर स्मरणात ठेवली. ज्यांनी खडतर प्रवासात साथ दिली, त्यांना कधीही न विसरणे, हाच या परिवाराचा सर्वात मोठा गुण आहे.” पहिला मान गावाचा आणि नंतर परिवाराचा, अशी भूमिका घेणाऱ्या खेडकर परिवाराच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुक करताना आमदार तांबे म्हणाले, हा मोठेपणा केवळ त्यांच्या बोलण्यात नाही, तर त्यांच्या कलेत, स्वभावात आणि वागण्या-बोलण्यातूनही सातत्याने जाणवतो. हा पुरस्कार तमाशा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा गौरव असून, या सन्मानामुळे लोककला क्षेत्राला आगामी काळात नक्कीच सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source link
संगमनेरचा पहिला " पद्मश्री' शहरात येताना अंगावर काटा आला:पद्मश्री हा केवळ रघुभाऊंचा नाही, तर तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा गौरव- आमदार तांबे