![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा करारी बाणा, त्याग, दूरदृष्टी आणि शौर्य हे अतुलनीय होते. मुघलांच्या काळात अनेक हिंदू मंदिरांची पडझड होत असताना त्यांनी देशभरातील मंदिरांचे जतन, पुनर्बांधणी आणि विकास करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच त्यांनी समाजकल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी तलावांची निर्मिती, पाणी व्यवस्थापन आणि लोककल्याणकारी कामांच्या माध्यमातून त्यांनी एक आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्याला ‘अहिल्यानगर’ हे नवीन नाव मिळाल्यानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने यंदाचा सोहळा महानगरपालिकेत अधिक उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महापौर ज्योती गाडे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर गाडे म्हणाल्या, अहिल्यादेवींचे कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणा, ऊर्जा आणि सकारात्मक दिशा देणारे आहे. विशेषतः मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवून शिक्षण, नेतृत्व आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पुढे यावे व जीवनात ध्येयवादी वाटचाल करावी. या कार्यक्रमात मनपाच्या सर्वच स्तरांतील अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांनीही जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, लोकाभिमुख प्रशासन आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कार्यात आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्यातून लोकहित, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा मोलाचा संदेश मिळतो, असे ते म्हणाले. लोकहित, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठेचा मोलाचा संदेश
Source link
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्याग, करारी बाणा अन् दूरदृष्टी अतुलनीय:मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवावा, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन