![]()
रब्बीच्या पेरणीला हातात पैसे नव्हते. पाऊस वेळेवर येईल म्हणून वाट पाहिली, पण त्याने दगा दिला. आणि जेव्हा आला, तेव्हा होत्याचे नव्हते करून गेला. निसर्गाच्या या लहरीपणाने एकाला हसवले तर दुसऱ्याला रडवले. गेल्या वर्षीच्या कापसाच्या भावाची कोंडी अजून फुटलेली नाही; उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न घटले. भूसार पिके हातची गेल्यावर मोसंबी तरी सुखाचे दिवस दाखवेल, या आशेने तीन एकरात ७०० झाडे लावली होती. पण आज पाच रुपये किलोनेही मोसंबी घ्यायला कोणी तयार नाही. पाण्याअभावी अर्धी बाग जळाली, तर उरलेली फळे मंगू रोगाने काळवंडली. शेवटी उभी बाग डोळ्यांदेखत उखडून टाकण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही, अशी खंत पैठण तालुक्यातील थेरगाव येथील शेतकरी आरेफखाँ ताहेरखाँ पठाण यांनी व्यक्त केली. निसर्गाची अवकृपा आणि बाजारपेठेतील घसरलेले भाव या दुहेरी संकटाने पिचलेल्या आरेफखाँ यांनी अखेर हताश होऊन आपल्या गट क्र. १६५ मधील तीन एकर मोसंबीच्या बागेवर जेसीबी फिरवून ती भुईसपाट केली. आरेफखाँ यांनी मोठ्या आशेने तीन एकरात मोसंबीची लागवड केली होती. चांगल्या उत्पन्नासाठी महागडी खते वापरली. विहिरींनी तळ गाठल्यानंतर लाखो रुपये खर्चून विकतच्या पाण्याने ही बाग जगवली. पोटच्या मुलाप्रमाणे झाडांची काळजी घेतली. मात्र, सलग चार वर्षांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने आणि सतत घसरणाऱ्या दरांनी मोसंबी उत्पादकांचे कंबरडेच तोडले. आरेफखाँ यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या भरवशावर खरीप आणि रब्बीसाठी खते-बियाणे उधार-उसनवारीवर आणली होती. फळबाग हातात येईल आणि कर्ज फेडू, अशी आशा होती. मात्र, फळबागांनी दगा दिल्याने ही आशा आता ‘मृगजळ’ ठरली आहे. शेतकरी संपूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडला आहे. मंगू रोगाचा प्रादुर्भाव अन् पाण्याचे संकट यंदा भर हिवाळ्यातच विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे चटके बसू लागले. त्यातच बागेवर मंगू रोगाच्या प्रादुर्भावाने उरलीसुरली फळेही काळवंडली. जमीन तरी मोकळी व्हावी आणि पुढच्या हंगामात दुसरे काही पीक घेता यावे, म्हणून त्यांनी बागेवर कुऱ्हाड चालवली. आता शेतीत पहिल्यासारखी मजा राहिली नाही Ãनिसर्गाच्या संकटाची मालिका थांबायला तयार नाही. कधी अतिवृष्टी तर कधी पाण्याचे दुर्भिक्ष. आमची स्वप्ने चुरडली गेली, पण आमच्यासाठी बोलायला कोणाकडे वेळ नाही; जो तो आपल्या कामात व्यस्त आहे. सध्या सर्व काही ऑनलाइन झाले आहे, पण शेतकरी मात्र पूर्णपणे ऑफलाइन आहे. कष्ट करूनही कोणी समजून घेत नाही. स्वप्नांवर पाणी फिरताना पाहून आता शेतीत काही मजा राहिली नाही, असे वाटते. -आरेफखाँ ताहेरखाँ पठाण, शेतकरी, थेरगाव पैठण थेरगावातील शेतकरी आरेफखाँ पठाण यांनी या मोसंबीच्या झाडांवर जेसीबी फिरवला.
Source link
पाणीटंचाईला वैतागलेल्या शेतकऱ्यानेमोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी:कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने हवालदिल झाले बागधारक