![]()
प्रतिनिधी | जामखेड जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून गाजावाजा करत राबवण्यात आली होती. मात्र, या कारवाईचा फुगा अवघ्या काही दिवसांतच फुटला आहे. बीड रोड कॉर्नर ते खर्डा चौक या मुख्य मार्गावरील अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाली आहेत. प्रशासनाची ही मोहीम फक्त ‘एक दिवसाचा फार्स’ होती का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने जेव्हा महामार्गावरील बेकायदेशीर बांधकामे आणि ओटे हटवले, तेव्हा रस्ता मोकळा झाल्याने जामखेडकरांनी सुटकेचा श्वास सोडला होता. वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र होते. मात्र, प्रशासनाचा पाठ फिरताच पुन्हा एकदा रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या, दुकानदारांचे व्यावसायिक साहित्य आणि इतर अडथळे उभे राहिले आहेत. यात भर म्हणून की काय, शनिवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी या मार्गावर वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी होते. रस्ता अरुंद झाल्याने पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले असून, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बीड रोड कॉर्नर ते खर्डा चौक हा राष्ट्रीय महामार्गाचा मुख्य भाग पुन्हा बाधित झाला. अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जागेवर सातत्याने देखरेख ठेवण्यात नगरपरिषद आणि संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. केवळ दिखाऊ मोहीम न राबवता, नियमित तपासणी करून अतिक्रमणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. अतिक्रमणांवर समान निकष लावून कठोर भूमिका घ्यावी अतिक्रमण मोहिमेबाबत जामखेडमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली आहे. प्रशासनाने कारवाई करताना काही धनदांडग्या आणि राजकीय वरदहस्त असलेल्या व्यवसायिकांच्या अतिक्रमणांकडे कानाडोळा केला, तर केवळ सर्वसामान्यांवरच कारवाईचा बडगा उगारला, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने निवडक कारवाई न करता सर्व अतिक्रमणांवर समान निकष लावून कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. जामखेड शहरात अतिक्रमणे पुर्ववत झाली आहेत.
Source link
जामखेडमध्ये महामार्ग पुन्हाअतिक्रमणांच्या विळख्यात:बीड रोड कॉर्नर ते खर्डा चौक या मार्गावरील अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत